

Youth Brutally Killed
डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडवरील काकाचा ढाब्याजवळील अंजनाबाई भाने उद्यानाबाहेर काळजाचा थरकाप उडविणारी गुरूवारी (दि.१६) रात्री पावणेअकराच्या सुमारास घटना घडली. पूर्ववैमनस्यातून सशस्त्र टोळक्याने २८ वर्षीय तरूणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला. हा हल्ला सोडवायला गेलेल्या तरूणाच्या मैत्रिणीवरही हल्लेखोरांनी चाकूने वार केले. एकीकडे या हल्ल्यातून प्रत्यक्षदर्शी मैत्रीण थोडक्यात बचावली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.
अर्जुन उर्फ पेंद्या गजानन काळपांडे (वय २८) असे हल्ल्यात ठार झालेल्या तरूणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील चक्की नाक्यावर असलेल्या गोसावी पुऱ्यातील गजानन काळपांडे चाळीत राहत होता. या प्रकरणी मृत अर्जुनचे वडील गजानन किसन काळपांडे (वय ६२) यांनी दिलेल्या जबानीवरून पोलिसांनी अविनाश झा उर्फ ए जे, बॉम्बे गौरव आणि त्यांच्या साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
गोसावी पुऱ्यात गेल्या ४५ वर्षांपासून राहणारे गजानन काळपांडे यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गजानन यांच्या व्यवसायाला अर्जुन देखिल हातभार लावत असे. अर्जुनचे हर्ष जयस्वाल उर्फ व्होडा, किरण बनसोडे आणि विद्यासागर मुर्तील उर्फ आण्णा हे तिघे मित्र आहेत. यातील हर्ष जयस्वाल याचे काही दिवसांपूर्वी अविनाश झा याच्याशी भांडण झाले आणि तेथूनच वादाची ठिणगी पडली.
गुरूवारी दुपारी ३ वाजता अर्जुन उर्फ पेंद्या हा दुकानाच्या कामासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. रात्री १०.३० वाजता वडिलांनी त्याला जेवणासाठी फोन केला असता त्याने बाहेर जेवलो आहे, तुम्ही जेवून घ्या, असे सांगितले. रात्री ११.३० च्या सुमारास वाजता अर्जुनचा मित्र संतनू याने फोन करून अर्जंट जनकल्याण हॉस्पिटलला या, असे सांगितले.
हे कळताच गजानन त्यांच्या पत्नी विजया आणि मुलगी रेणुकासह तातडीने हॉस्पिटलला पोहोचलो. तेथे गर्दी जमली होती. अर्जुनचे मित्र विद्यासागर मुर्तील उर्फ आण्णा, हर्ष जयस्वाल उर्फ व्होडा आणि किरण बनसोडे यांनी अविनाश झा आणि बॉम्बे गौरव या दोघांनी अर्जुनवर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये पाहिले असता अर्जुन बेडवर निपचित पडला होता. त्याच्या शरीरावर जागोजागी जखमा होत्या. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
हॉस्पिटलमध्येच अर्जुनची मैत्रीण स्नेहा पाणीग्रही भेटली. तिने सांगितले घडलेल्या थरारक घटनेची माहिती दिली. रात्री ११.४५ च्या सुमारास बहीण श्रेया आणि अर्जुनसह आम्ही अंजनाबाई भाने उद्यानाबाहेर रोडवर बोलत उभे होतो. इतक्यात अविनाश झा उर्फ ए.जे., बॉम्बे गौरव आणि त्यांच्यासोबत काही अनोळखी लोक दुचाकीवरून आले. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी पुन्हा भांडण उकरून अर्जुनला शिवीगाळ केली.
अविनाश झा याने अर्जुनच्या पोटात चाकू खुपसला. तर बॉम्बे गौरव यानेही चाकूने पाठीवर आणि इतर ठिकाणी वार केले. या हल्ल्यातअर्जुन गंभीर जखमी झाला. सोडविण्यासाठी गेले असता अविनाश झा याने मैत्रीण स्नेहावर देखील चाकूने सपासप वार केले. वार हातावर झेलल्याने यात हल्ल्यात स्नेहा थोडक्यात बचावली. तिच्या हाता-पायाला जखमा झाल्या. त्यानंतर थोड्या वेळात अर्जुनचा मित्र विद्यासागर मुर्तील उर्फ आण्णा तेथे आला आणि त्याने अर्जुनला हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र तत्पूर्वीच त्याने दम तोडला होता.
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अर्जुनचा मैत्री गोतावळा खूप मोठ्या संख्येने आहे. समाज माध्यमांवरही अर्जुन लोकप्रिय होता. मित्रांनी समाज माध्यमांवर अर्जुनच्या मृत्यूप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. कल्याणची आण बाण शान अर्जुन काळपांडे...तू आमच्या हृदयात कायम जिवंत राहशील...अशा शब्दात त्याच्यावर प्रेम करणाऱ्या तरूण वर्गाने श्रद्धांजली अर्पण करताना तुझी आठवण आणि तुझे काम आमच्या सोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या प्रकरणी गजानन काळपांडे यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी अविनाश झा उर्फ ए जे (रा. काका ढाबा, कल्याण-पूर्व) बॉम्बे गौरव (रा. द्वारली, कल्याण-पूर्व) आणि त्यांच्या साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्जुन उर्फ पेंद्या काळपांडे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयाकडे पाठवून दिला.
या हल्ल्यानंतर सर्व मारेकरी नाट्यमयरित्या भूमिगत झाले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही समांतर तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत.