

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणमधील 12 तरूणांचा ग्रुप वर्षा सहलीसाठी शहापूर तालुक्यातील शेणवे-खैरे रस्त्यावर असलेल्या केरला व्हिलेज या गृहप्रकल्पाकडे गेला होता. या ग्रुपमधील एक तरूण रविवारी संध्याकाळी खैरे गावाजवळील दुथडी भरून वाहत असलेल्या बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पोहण्यासाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला आणि बेपत्ता झाला. विनायक वाझे ( वय 29) असे या तरूणाचे नाव असून अजूनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. (Thane Kalyan News)
रविवार संध्याकाळी उशिरापर्यंत स्थानिक किन्हवली पोलिसांच्या सहकार्याने जीवरक्षकांनी बेपत्ता विनायकचा शोध घेतला. तथापी तो कुठेही आढळून आला नाही. सोमवारी सकाळपासून जीवरक्षक समीर चौधरी, अनिल हजारे, गजानन शिंगोळे, भावेश ठाकरे, रविंद्र मडके, रमेश डिंगोर हे खैरे येथील केटी बंधारा आणि मुसई बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात बेपत्ता विनायकचा शोध घेत आहेत. विनायक वाझे हा उत्तम जलतरणपटू आणि कल्याणमधील एका जीममध्ये ट्रेनर म्हणून काम पाहतो. (Thane Kalyan News)
कल्याणमधील 12 तरूणांचा एक ग्रुप रविवारी शहापूर तालुक्यातील शेणवे-खैरे रस्त्यावरील केरला व्हिलेज या गृहप्रकल्पात वर्षा पर्यटनासाठी आले होते. दुपारी जेवण आटोपल्यानंतर या ग्रुपला मुसई बंधाऱ्यातून वाहत असलेल्या ओहळात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. या ओहळाला जलसाठ्यासाठी केटी बंधारा बांधण्यात आला आहे. (Thane Kalyan News)
विनायक याने बंधाऱ्याच्या भिंतीवरून उडी मारताच त्याला ओहळातील खडकाचा जोरदार फटका बसला. या फटक्यामुळे पाण्याखाली गेलेला विनायक पुन्हा वर आला नाही. हे पाहणाऱ्या इतर तरूणांना तो डुबकी मारण्यासाठी गेला असावा, असे सुरूवातीला वाटले. बराच वेळ झाला तरी विनायक पाण्याबाहेर येत नसल्याचे लक्षात येताच त्याच्या सोबत असलेल्या ग्रुपमधील तरूणांची घाबरगुंडी उडाली. याच दरम्यान ओहोळाला पूर होता. ही माहिती तत्काळ स्थानिक गावकऱ्यांसह पोलिसांना देण्यात आली.
जीवरक्षक दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता झालेल्या विनायकचा शोध घेऊनही तो सापडला नाही. तो ओहळातील दगडांच्या कपारीत अडकला असण्याची किंवा वेगवान पाण्यामुळे सारंगपुरी नदी भागात वाहून गेला असण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे.