

ठाणे : विनाहेल्मट दुचाकी चालविणार्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतो. या कारवाईमुळे अनेकदा पोलीस आणि चालकांमध्ये वाद होतात. परंतु आता राज्य वाहतुक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दुचाकीवर विनाहेल्मेट चालकासह त्यासोबत विनाहेल्मेट प्रवास करणार्या प्रवाशावरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात मागील पाच वर्षामध्ये रस्ते अपघातांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झालेली आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार आण त्यांच्या पाठीमागे असलेला सह प्रवासी यांचे अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण अधिक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, विना हेल्मेट आणि त्याच्यासोबत सह प्रवाशाने हेल्मेट वापरले नसल्यास त्यावर कायदेशीर कारवाईचे नियम आहेत. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे वाहतुक पोलिसांकडून ई-चलान यंत्राद्वारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांविरोधात कारवाई केली जाते. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालविणार्यांचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत पोलिसांकडून केवळ विना हेल्मेट वाहन चालकाविरोधात कारवाई केली जात होती. परंतु आता त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या सहकार्याविरोधातही दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहे. तसेच ई - चलान यंत्रांमध्ये कलम 129/194 (ड) मोटार वाहन कायद्यांतर्गत एकाच पद्धतीने कारवाई केली जात होती. परंतु आता यंत्रांमध्ये बदल करून दोन्ही पद्धतीने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे आता ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात कारवाई केली जाणार आहे.