शहापुर तालुक्यात सध्या ऊनपावसाच्या खेळामुळे वातावरणात वारंवार बदल होत असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर,गल्ली, बोळात व गटारित डबक्याचे साम्राज्य पसरल्याने डासांचा उपद्रव वाढला असून एन गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थ आजारी होत आहेत.
ठिक ठिकाणी कचर्याचे ढिग निर्माण झाले आहेत त्यामुळे डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीत गणेशोत्सवापूर्वी घरोघरी जंतुनाशक फवारणी करण्याची गरज निर्माण झाली असतांना देखील याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. डास उत्पत्तीमुळे तालुक्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात मलेरिया, टायफाईड व तापाच्या रुग्णात वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.
ठिकठिकाणी सर्वत्र साचलेलं पाणी व सर्वत्र कचर्याचे पसरलेले ढीग यामूळे त्यामध्ये निर्माण होणारे जीवजंतु आणि त्यातूनच वितरित होणारे पिण्याचे पाणी तसेच साचलेल्या घाण पाण्यावर होणारे डास यामूळे परीसरात मलेरिया, फ्ल्यू, गैस्ट्रो, कावीळ व पोटदुखी यासारखे साथीचे आजार पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची तीव्रता व ठिकठिकाणी साचलेले पाणी यामूळे डासांची उत्पत्ती होत आहे. तर ठिकठिकाणी जमा झालेल्या कचर्याकडे स्थानिक ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या दुर्लाक्षामुळे परिसरात कचर्याचे ढिग जमा झाले आहेत, त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वातावरणात बदल होऊन डासांची उत्पत्ती वाढून रुग्ण वाढत असल्याने सर्व ग्रामपंचायत हद्दीत गणेशोत्सवापूर्वी जंतुनाशक फवारणी करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना आदेश देण्यात येतील व नागरिकांनी घराजवळ ओला कचरा साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
बी. एस. रेंगडे, गटविकास अधिकारी, शहापुर पं.स.