कल्याण; पुढारी वृतसेवा : गेली अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीकरांना स्वत:च्या मालकीचे धरण नसल्याने पाण्यासाठी दुसऱ्याच्या धरणावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे वर्षानुवर्ष कल्याण डोंबिवली महापालिका हक्काच्या धरणासाठी पाठपुरावा करत असून आता काळू धरणाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवला जाणार असून नजीकच्या काळात कल्याण पूर्व पश्चिम भागात दोन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच राज्यभरात डबघाईला आलेल्या साखर कारखान्याना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडून १० हजार कोटी रुपयांची सवलत मिळवून दिली आहे. तसेच या पूर्वी घोषणा केल्याने तूर्तास तरी साखर उद्योगावर आलेले आर्थिक आरीस्ठ टळले आहे. त्यामुळे राज्याच्या लोक हिताचे घेतलेले लोकाभिमुख निर्णयामुळे विकासाच्या झंझावातासाठी आम्ही घेतलेली ही भूमिका तुमच्या मनातील भूमिका असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी मॅक्सी मैदानात घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत शेवटची सभा याच मैदानावर झाल्याचे सांगितले. कल्याण येथील काळा तलावाचे सुशोभीकरण करणे हा बाळासाहेब यांचा मानस होता. त्यांचा हा मानस पूर्ण केला असून हा काळा तलाव आता भगवा तलाव झाला आहे. या तलावावर रंगेबिरंगी कारंजे आणि नागरिकांना सुदृढ राहण्यासाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर नागरिकांना बोटिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी आयुक्त भाऊ साहेब दांगडे यांना सूचना दिल्या.
ठाणे जिल्ह्यातील काळू नदीवर बांधले जाणारे काळू धरण पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा स्त्रोत मानले जाते. मात्र धरणात बाधित होणाऱ्या बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडल्याने अनेक वर्षापासून काळुधरण्याचा प्रश्न अडकून पडला होता. आता या धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वनविभागाला 410 कोटींचा निधी राज्य शासनाकडून देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यामुळे महत्त्वाचा असलेला जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे
कल्याण मध्ये नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही आबाळ होऊ नये यासाठी दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभी करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आयुक्तांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जो काही निधी लागेल तो नगर विकास मधून देऊ असे आश्वासन देत कोणत्याही कामासाठी निधी अपुरा पडणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कल्याण डोंबिवलीकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र ही पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी काळू धरणाचा प्रकल्प राबवण्यात येत असून चारशे दहा कोटी रुपये काढून धरणाच्या या प्रकल्पासाठी देण्यात आले आहेत आणि याचे काम देखील सुरू झाले आहे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. यावेळी बीएसयुपींच्या घरांचे वाटप देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांना हक्काचे घर देणारे आमचे सरकार आहे असे सांगत सरकार कायदा नियम हे सगळे नागरिकांसाठीच असते असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई खड्डे मुक्त झाली त्याचप्रमाणे एम एम आर रीजन देखील खड्डे मुक्त करू असे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले. डबल इंजिनचा सरकार धावत असल्याने ते इंजिन आता नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी गतिमान झाले आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.