

नेवाळी : 14 गावातील ठाकूरपाडा परिसरात शुक्रवारी (दि.18) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोडाऊनला मोठी आग लागल्याची घटना घडली. ही आग डांबराच्या शिट्स आणि रासायनिक ड्रमचा साठा असलेल्या गोडाउन्सला लागल्याची माहिती समोर आली आहे. या अग्नितांडवात तब्बल 25 गोडाऊनचा कोळसा झाल्याचा प्राथमिक अंदाज नवी मुंबई अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे.
आगीची तीव्रता लक्षात घेता घटनास्थळी वाशी, नेरुळ, सीबीडी बेलापूर, पनवेल, कळंबोली, शिळफाटा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. नवी मुंबईत गेलेल्या 14 गावांमध्ये आगीचे आता सत्र सुरू झाले आहे. ठाकूरपाडा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री हा महाअग्नितांडव समोर आला आहे. या महाभयंकर आगीच्या घटनेन परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले होते. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीने परिसरातील नागरिकांची झोपच उडवली. गोडाऊनमध्ये ज्वलनशील साहित्य असल्याने एक एक गोडाऊनला आग लागत तब्बल 25 गोडाऊनचा कोळसा झाल्याचा प्राथमिक अंदाज नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला आहे. सुदैवाने या अग्नितांडवात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये आता सुरू झालेल्या अग्नितांडवामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहिसर मोरी ठाकूरपाडा येथील इराणी मज्जीद समोर असलेल्या गोडाउन्सला ही आग लागली होती. या आगीच्या घटनेमध्ये भंगार, डांबराचे शीट्स बनविणारे गोडाऊन आणि प्लास्टिकच्या ड्रमचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. मात्र या अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात रासायनिक साठा नष्ट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान या आगीच्या घटनेने परिसरातील उघड्यावर असलेल्या ज्वलनशील साहित्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु या परिसराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे.
14 गावांतील ठाकूरपाडा परिसरात दिवसेंदिवस रासायनिक प्रयोग वाढत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अनेक स्तरातून प्रयत्न देखील केले जात आहेत. या परिसरातील रासायनिक हालचालींमुळे निसर्ग सौंदर्याची देखील दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या प्रकाराकडे लक्ष द्यायला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कधी वेळ मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.