

भिवंडी (ठाणे): भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये आग लागण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. सोमवारी (दि.12) रोजी पहाटे मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीतील रिचलँड कॉम्प्लेक्स या भल्या मोठ्या गोदाम संकुलास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या गोदाम संकुलात एकूण 22 गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत.
या गोदामात कपडे, बूट, केमिकल, इलेक्ट्रॉनिकस साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्याने या गोदामांमध्ये लागलेली आग झपाट्याने पसरत सर्वच्या सर्व 22 गोदाम व त्यामध्ये साठवलेला कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडीसह कल्याण येथील प्रत्येकी दोन अशा चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले. परंतु पाण्याची कमतरता असल्याने आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलास अडचण येत होती. तर केमिकल गोदामातील आग नियंत्रणात आणण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.Pudhari News Network
रिचलँड कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात के. के. इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा.ली., कॅनन इंडिया प्रा. ली. कंपनी, ब्राईट लाईफकेअर प्रा.ली. कंपनी, होलीसोल प्रा. ली. कंपनी, एबॉट हेल्थकेअर प्रा. ली. कंपनी, डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम होते. या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर, कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते. तब्बल नऊ तासांनी या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले.