

डोंबिवली : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारीदिवसभरात कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा सिटीमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित आले होते. पॉज आणि लंडनची जागतिक पशु वैद्यकीय संघटना, तसेच रॉट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली-ईस्ट यांनी ही मोहीम फत्ते केली. या मोहिमेत जवळपास 252 भटक्या जनावरांना ही लस टोचण्यात आली.
प्लॅन्ट फाॅर ॲनिमल वेल्फेअर सोसायटी अर्थात पाॅज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी हरिहरन, रीमा देशपांडे, अभिषेक सिंग, ऋषिकेश सुरसे, कौस्तव भट्टाचारजी आणि हरिहरन रामास्वामी यांनी विशेष मेहनत घेतली.
रॉट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे सर्व श्वानांना रेबीज लस दिल्यावर रेडियमचा पट्टा गळ्यात घालण्यात आला की जेणेकरून लसीकरण झाले म्हणून ओळखता येईल आणि रेडियम पट्टा असल्याने त्या श्वानांना रात्री अपघात होण्यापासून वाचवता येईल, असे क्लबचे अध्यक्ष संकेत भणगे यांनी सांगितले. पलावा सिटीच्या सर्व क्लस्टरमध्ये ही मोहीम राबविण्यासाठी पलावातर्फे शिबू चक्रवर्ती आणि संकेत शुक्ला यांनी श्वान पकडण्यास मदत केली.
काही वर्षा पूर्वी एका व्यक्तीवर कुत्रा धावून गेल्यामुळे पलावा ईथे श्वानांना खायलाही देण्यास मज्जाव केल्याचे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते. यावर पॉज संस्थेने हरकत घेऊन हे फलक काढावेत म्हणून नोटीसही पाठवण्यात आल्या. तसेच पलावामध्ये तातडीने नसबंदीसाठी गाड्या पाठवून बऱ्याचश्या श्वानांची नसबंदी करून घेतले. पलावाला बाऊंडरी अर्थात कुंपण नसल्याने श्वान बाहेरून आत शिरकाव करत असल्याने गोंधळ होत असल्याचे डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीसह अन्य शहरांत फक्त पॉज संस्था रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालवते. गेल्या वर्षी सुमारे 3500 भटक्या श्वानांना लास देण्यात आली. यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. दर पंधरा दिवसांनी पॉजचे स्वंयसेवक कॉलनीमध्ये फिरून ही मोहीम राबवत असतात आणि याची सुरूवात 2001 मध्ये झाली. ही मोहीम गेल्या 25 वर्षांपासून पॉज अविरत चालवत आहे. यावर्षी रेबीजमुळे कल्याण-डोंबिवलीत एकाचा मृत्यू रेबीजमुळे झाला. त्यामुळे ही मोहीम या वर्षी जोरदारपणे राबविण्यात येणार असल्याचे पॉजच्या संस्थापक अनुराधा रामस्वामी यांनी सांगितले.
या संदर्भात पॉजचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी माहिती देताना सांगितले की, रेबिजचा रोग कुत्रा चावल्याने जडतो. या भयानक रोगाविषयी लोकजागरण व्हावे, तसेच रेबिजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत. या विशिष्ट दिवशी लसीकरण मोहीम, कुत्र्यांचे निर्बीजीकरण, धावण्याच्या स्पर्धा (रन फॉर रॅबिज), कवायती, शैक्षणिक सभासत्रे, विविध सोहळे, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. एकत्रित येऊन रेबिजला भूतकाळात गाडा, या सूत्राने विश्व रेबिज दिनाचे सोहळे आयोजित होतात. रेबिज हा रोग बरा होतो. तरीही जगभरात दर दहा मिनिटाने एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्युमुखी पडतो. दरवर्षी जगभरात 52 हजार 560 जण रेबिजमुळे दगावतात. मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये 15 वर्षे वयोगटाखालील मुलांचा समावेश असल्याचे डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.
लस न टोचलेला श्वान व्यक्तीला चावल्यास त्याला हा रोग प्रामुख्याने जडतो. मात्र तरीही या लसीकरणाकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते. कारण या औषधाची किंमत गरीबांना परवडणारी नसते. जगातील बर्याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी 99 टक्के मृत्यू रेबीड कुत्रा चावल्यामुळे होतात. तर आफ्रिका आणि आशियात 95 टक्के मृत्यू होतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील माणूस आणि प्राण्यांना रेबीजचा धोका संभवतो, असेही डॉ. निलेश भणगे म्हणाले.