

ठाणे : दिलीप शिंदे
ठाण्याची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची नसून एकनाथ शिंदे यांची आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर ठाणे जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला नसल्याच्या भाजपच्या दाव्यावर दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब झाले आहे. ठाणे वगळता अन्य पाच महापालिकांमध्ये बहुमताचा आकडा शिवसेनेला गाठता आला नाही. उलट ठाणे जिल्ह्यात आपणच मोठा भाऊ असल्याचे अधोरेखीत झालेल्या भाजपने नवी मुंबई, मीरा भाईंदर महापालिकेत एक हाती सत्ता खेचून उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये सेनेच्या तोडीचे यश मिळविले. भिवंडी महापालिकेतील भाजपचे यश ही लक्षणीय आहे.
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिष्ठापणाला लागलेल्या ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका निवडणुकीत महायुतीने विरोधी पक्षांना धूळ चारली आहे. अपवाद भिवंडी महापालिका आहे. ठाणे महापालिकेत 103 जागा जिंकण्याचा विक्रम सेना-भाजप महायुतीने केला. त्यामध्ये 75 जागा शिवसेना आणि 28 जागा भाजपने जिंकल्या आहेत.
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने त्यांचा पुरता धुव्वा उडाला. त्यात काँग्रेसचाही मोठा वाटा आहे. आघाडीतून बाहेर पडून काँग्रेसने स्वबळाचा नारा देत महायुतीला एकप्रकारे मदत केल्याचे चित्र मुंब्र्यातील निकालावरून दिसून येते. काँग्रेसला भोपळा ही फोडता आले नाही. मागील निवडणुकीत तीन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. ठाकरे शिवसेनेला सोबत घेऊनही मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. यावरून मनसेला संघटन बांधणीची किती गरज आहे हे स्पष्ट होते.
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळविणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत अपेक्षित यश मिळाले नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईकरांनी स्वीकारले आणि मुंबईत शिवसेना ठाकरेंचीच हे स्पष्ट झाले. मात्र ठाण्यात ठाकरे शिवसेनेचा पुरता धुव्वा उडाला आणि ठाणेकरांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहून दिवंगत आनंद दिघे यांच्या शिष्याला आशीर्वाद दिल्याचे स्पष्ट झाले. मात्र शिंदे यांचे जिगरी मित्र असलेले माजी महापौर अशोक वैती यांना पराभूत करून ठाकरे गटाने मोठा झटका दिल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांचा पराभव झाला. यातून ठाकरे सेना किती कमजोर झाली आहे, हे दिसून येते.
शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून ठाण्यात पहिल्यांदा फक्त एकच नगरसेवक निवडून येण्याची घटना घडली आहे. यावरून शिवसेनेची किती वाताहत झालेली आहे आणि कसे कमजोर उमेदवार निवडले गेले यावर चर्चा सुरु झाली आहे. उलट शिंदे यांच्या शिवसेनेने 79 जागा लढवून 75 जागा जिंकल्या. एकहाती सत्ता मिळविली. भाजपने 38 जागा लढवून सर्वाधिक 28 जागा जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
ठाणे विधानसभा मतदार संघात 35 जागांपैकी 31 जागा महायुतीने जिंकल्या. त्यापैकी 21 नगरसेवक हे आमदार संजय केळकर यांच्या भाजपचे आहेत. उर्वरित सात नगरसेवक हे ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी आणि कल्याण ग्रामीण मतदार संघातून विजयी झाले आहेत. एकंदरीत ठाण्याची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची नसून एकनाथ शिंदे यांची आहे, यावर ठाणेकरांनी शिक्कमोर्तब केले आहे.
ठाणे वगळता उर्वरित ठाणे जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजपची सरशी झालेली आहे. 9 आमदार असलेल्या भाजपने नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये एक हाती सत्ता मिळविली. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांचा टांगा पलटी केला आणि नवी मुंबईचे किंग असल्याचे सिद्ध करून दाखवले. मीरा भाईंदरमध्येही भाजपचे नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना धोबीपछाड दिली.
स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचे अस्तित्व दाखवून समसमान ताकद दाखवली आहे. त्यामुळे महापौर कोणाचा होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कल्याणमध्ये कुणाचा महापौर बसणार याकडे लक्ष
उल्हासनगर महापालिकेत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र आघाड्या करून समसमान ताकद दाखवल्याने अपक्ष आणि काँग्रेसच्या मदतीने महापौर बनवावे लागणार आहे. भिवंडीत काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली, भाजपने शिवसेनेपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले आहेत. एकंदरीत ठाण्यात शिवसेना तर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये भाजपचा महापौर होणार आहे. कल्याणमध्ये कुणाचा महापौर बसणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भिवंडीत काँग्रेसची सत्ता कायम राहील. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपच हाच मोठा भाऊ असून ठाण्याची शिवसेना ही शिंदे यांचीच असल्याचे ठाणेकरांनी दाखवून दिले आहे.