मुरबाड : मुरबाडमधील वैशाखरे गावातील 26 वर्षीय युवकाचा कावीळमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून गावातील दुषित पाण्यातून त्याला कावीळची बाधा झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुणाल चंद्रकांत उंबरे असे मृत तरुणाचे नाव आहे.
कुणाल गणपती सणानिमित्त तो गावी आला असता गावातील दूषित पाण्यामुळे त्याला कावीळचा संसर्ग झाला. कुणालची तब्बेत खालावलेली जाणवू लागल्याने त्याला काही दिवसांपूर्वी उल्हासनगर येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने तेथून पुढे नेण्यास सांगितले असता त्याला मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली. कुणाल पाठोपाठ गावातील सहा ते सात जणांनी टोकावडे रुग्णालयात धाव घेतली असून यातील पूर्वा उंबरे हिची तब्बेत चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच पूर्वाचे वडील धर्मराज उंबरे यांना देखील कालपासून थकवा जाणवू लागल्याने उपचारासाठी हॉस्पिटल गाठावे लागले आहे. या सर्व प्रकाराला गावातील दूषित पाणी पुरवठा कारणीभूत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. मागील वर्षभरापासून रखडलेली नवीन पाणीपुरवठा योजना वेळेत चालू केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशा प्रतिक्रिया गावकर्यांकडून मिळत आहेत.
त्यामुळे याप्रकरणी वरीष्ठ स्तरावरून दखल घेऊन यथायोग्य कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता कॉल न लागल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. तर या प्रकाराला ग्रामसेविका देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.