

उल्हासनगर : शहरात साखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून आता थेट मंदिरात घुसून चोरी करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मराठा सेक्शन भागात गुरूवारी (दि.२) सकाळी साडेसहा वाजता ही धक्कादायक घटना घडली. शिक्षिका जयश्री पाटील या महादेवाच्या मंदिरात पिंडीवर पाणी अर्पण करत असताना, पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून नेले. या दागिन्याची किंमत अंदाजे ४२ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांत चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपींनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटणे कठीण आहे तरीही पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती उल्हासनगर पोलिस उपयुक्त सचिन गोरे यांनी दिली.