डोंबिवली : नोकरीचे आमिष दाखवून 3 लाख उकळले : कल्याण-डोंबिवली पालिकेतील कर्मचार्याला कारणे दाखवा नोटीस, या मथळ्याखाली दैनिक पुढारीने 12 जुलैच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गंभीर दखल घेऊन नोकरी लावण्याचे अमिष दाखवून इच्छुक उमेदवारांना नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणार्यांपासून सावधानतेचा इशारा दिला आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. (Kalyan Dombivli Municipal Corporation)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत शासनाने मंजूरी दिल्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर आणि रिक्त पदांकरिता आवश्यकतेनुसार शासनाने विहीत केलेल्या पध्दतीचा अवलंब करूनच भरती प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. तथापी याच संधीचा फायदा उचलून काही बदमाश मंडळी केडीएमसीत नोकरीचे अमिष दाखवून इच्छुक उमेदवारांकडून पैसे उकळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्या उमेदवारांनी अशा अनोळखी व्यक्तींपासून सावध रहावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी केले आहे.
केडीएमसीच्या संकेतस्थळासह प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर तपशील नमूद करण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेदरम्यान इतर आवश्यक माहिती देखिल वेळोवेळी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने महापालिकेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही. परंतु काही अनोळखी व्यक्ती महानगरपालिकेच्या नावाने नोकरी मिळवून देतो, असे अमिष दाखवून इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने पैसा उकळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फसवणूकीचे गुन्हे घडून संबंधीत उमेदवाराचे नाहक आर्थिक व इतर नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत नमूद केलेल्या विहीत भरती प्रक्रियेनुसारच पद भरती करण्यात येणार आहे.नागरीकांनी/उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा दलालांमार्फत अशा पद्धतीने फसवणूक करत असल्यास अथवा भरतीच्या संदर्भात अफवा पसरवताना निदर्शनास आल्यास तात्काळ महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांची फसवणूक केल्याचे आढळून आल्यास संबंधितांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांसह उमेदवारांनी अशा प्रकारे होणार्या फसवणूकीपासून सावधगिरी बाळगावी. या प्रकारामध्ये अधिक दक्षता व सतर्कता दाखवून महापालिकेस असे गैरप्रकार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी केले आहे.