

ठाणे : आपला दवाखान्याच्या धर्तीवर शहरांमधील विविध भागात नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र उभारली जाणार आहेत. या आरोग्य वर्धिनी केंद्राच्या माध्यमातून ठाणेकरांना चांगली आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. असे असताना, ठाणे महापालिका हद्दीत 68 पैकी एक आपला दवाखाना सुरू झाल्यानंतर महापालिकेने आणखी तीन ठिकाणी अशा पद्धतीने आरोग्य वर्धिनी केंद्र (आपला दवाखाना) सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्याने ठाणे पालिकेने पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आरोग्य वर्धिनी केंद्राला ठेकेदारांची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे महापलिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून विविध भागात 40 हून अधिक ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आले. मात्र, या आपला दावाखाना प्रकल्पास ठेकेदारांमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यात ठाण्यातही राम नगर भागात एकमेव आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू झाले आहे. उर्वरीत 11 दवाखाने हे तत्काळ सुरू करणे अपेक्षित असतांना ते अद्यापही सुरू झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून आपला दवाखान्यांच्या धर्तीवर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात 68 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जाणार असून पैकी 14 ठिकाणच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. परंतु आता काही ठिकाणी जागांच्या अडचणी दूर झाल्यानंतर पालिकेने टप्याटप्याने त्या त्या भागात आपला दवाखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कासारवडवली, टिकुजिनीवाडी आणि नौपाडामध्ये पाचपाखाडी या तीन भागात अभिव्यक्ती स्वारस्स देकार महापालिकेने मागविले आहेत. त्यानुसार त्याची निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ दिली आहे. आधी जागांचा शोध त्यानंतर जागा मिळाल्यावर आता ठेकेदार मिळत नसल्याने आपला दवाखाना केव्हा सुरू होणार असा पेच पालिकेसमोर उभा ठाकला आहे.
दरम्यान, ठाणे पालिका हद्दीतील दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, खिडकाळी, हाजुरी शाळा क्रमांक 122, कोपरी जकात नाका, येऊर, बामनोई पाडा, विटावा शाळा क्रमांक 72, पातलीपाडा आणि कोलशेत अशा 14 ठिकाणी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.