भिवंडी : भिवंडी शहरातील वेगवेगळ्या परिसरातून एकाच दिवसात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याबाबतच्या तक्रारी नजीकच्या पोलीस स्थानकात देण्यात आल्या आहेत. (Three minor girls have been abducted from different areas of Bhiwandi city in a single day.)
गायत्रीनगर, रामनगर येथील 16 वर्षांची मुलगी ही 27 जुलै रोजी साडे सातच्या सुमारास घरी असताना अज्ञात इसमाने फूस लावून तिला पळवून नेले. तर दुसर्या घटनेत पिराणीपाडा शांतीनगर रोड येथील 16 वर्षीय मुलगी ही घरात झोपली असताना पहाटे पाच वाजताच्या सुमारास तिच्या भावाला ती घरात आढळून आली नाही. तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता, ती सापडली नाही. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कोणीतरी पळवून नेले असल्याचे लक्षात आल्याने पालकांनी तक्रार दिली आहे. या दोन्ही प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या घटनेत विठ्ठलनगर नारपोली येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही गुरुवार (दि.२५) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विठ्ठल नगर येथील मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिला शोधूनही ती न सापडल्याने तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची खात्री झाल्याने वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.