![Bambu](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F49fc1734-9968-4b9f-8ec4-24d11fcbff80%2F2_33.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ठाणे : शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर आणि फळबाग व फुलपिके कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, जून अखेर जिल्ह्यातील ४७४ शेतकऱ्यांनी बांबू लागवडीबाबत कृषी विभागाला हिरवा कंदील दाखवला आहे. लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी विभागाने बांबू लागवडीबाबत जनजागृती सुरू केली असून, सर्वाधिक प्रस्ताव शहापूर आणि भिवंडी तालुक्यातून प्राप्त झाले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत ठाणे जिल्ह्यात बांबू लागवड अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना ५ गुंठ्यांपासून २ हेक्टरपर्यंत बांबू लागवड करता येणार आहे. १ हेक्टर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगातून ३ वर्षापर्यंत ७ लाख रुपये कुशल, अकुशल मजुरीच्या स्वरूपात दिले जाणार आहेत. बांबू हे शेतकऱ्यांसाठी बुहब्देशीय उपयोगी पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमांतून जोड धंदा मिळवा म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यात बांबू लागवडीबाबत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. कुटुंच विभाजनामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. त्याचा परिणाम ही बांबू लागवड योजनेवर दिसणार आहे. शिवाय लागवड झाल्यानंतर तीन वर्षांनी नफाप्राप्ती होणार आहे. तसेच विक्री कुठे, कशी होणार याबाबतची शेतकऱ्यांत जागृती केली जात नाही. योजना प्रत्यक शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी लागवडीपासून विक्रीपर्यंतची जागृती करण्याची गरज आहे.
ठाणे जिल्हा परिषदेला शासनाकडून ४०० हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, जिल्हा परिषदेने ४ हजार हेक्टर बांबू लागवडीचे नियोजन केले आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक नफ्याच्या दृष्टीने बांबू लागवड फायदेशीर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पत्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे,
बांबू लागवड कार्यक्रम राचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तालुकास्तरीय अधिकारी यांच्या मार्फत जनजागृती सुरु केली आहे. मुरबाड -व शहापूर तालुक्याला प्रत्येकी १ हजार हेक्टर, भिवंडी तालुक्याला ६०० हेक्टर, कल्याण तालुक्याला २५० तर अंबरनाथ तालुक्याला १५० हेक्टर उद्दिष्ट मिळले आहे. जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतीतील ४७४ शेतकऱ्यांनी यासाठी प्रस्ताव पाठवले असून, यासाठी ७४ हजार ६१५ बांबूच्या रोपांची आवश्यकता भासणार आहे.