

डोंबिवली: ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर बंदिश चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महावितरणचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चार विजेच्या खांबांसह रस्त्यावर आडवे झाले.
वर्दळीच्या या रस्त्यावर सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या रस्त्याने जाणारा दुचाकीस्वार मात्र थोडक्यात बचावला.
घटनेच्या वेळी एक दुचाकीस्वार रोहित्र कोसळणाऱ्या ठिकाणाहून जात होता. तो शेवटच्या क्षणी कोसळणाऱ्या खांबाच्या कक्षेत आल्याने त्याची दुचाकी खांबांखाली अडकली. दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ खरचटले आहे. त्याच्या दुचाकीचे मात्र नुकसान झाले आहे.
सोमवारपासून शहरात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खांब पुरलेली माती भुसभुशीत झाली. त्यामुळे रोहित्राचा भार न पेलल्याने ते चार खांबांसह रस्त्यावर आडवे झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका शारदा चौधरी, उपमहापौर राहूल दामले, अभिजीत थरवळ, प्रदीप चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेवून,महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिसरातील वीजपुरवठा खंडित करून रस्ता वाहतुकीसाठी लवकर खुला करण्याची मागणी केली. रोहित्र पुन्हा सुस्थितीत बसवून वीजपुरवठा वेळेत पूर्ववत करण्याच्या सूचनाही दिल्या.
तर कल्याण-डोंबिवलीतील सर्व रोहित्रांची तातडीने संरचनात्मक तपासणी करावी, अशी मागणी महावितरण मुख्य अभियंत्यांकडे करणार असल्याचे नगरसेविका शारदा चौधरी यांनी सांगितले.
ठाकुर्ली भागात अनेक नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. या संकुलांना वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणने रोहित्र उभारली आहेत. विकासक इमारतीच्या आत रोहित्रासाठी जागा देत नसल्यानेरस्त्याच्या कडेला रोहित्र उभारण्याची वेळ येते.
दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आडवे झालेले सर्व खांब क्रेनच्या साह्याने बाजूला करून बंद झालेला रस्ता वाहतुकीस पूर्ववत करून दिला. शिवाय या दुर्घटनेची तांत्रिक चौकशी करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.