

आसनगाव/पालघर : ठाणे व पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तानसा आणि मोडकसागर ही धरणे शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाली असून, कवडास धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर भातसा धरणातील पाणीसाठा ७३.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, तानसा धरणात १४५.०८ दशलक्ष घनमीटर, तर मोडकसागर धरणात १२८.९३ दशलक्ष घनमीटर इतका पूर्ण क्षमतेचा पाणीसाठा जमा झाला आहे. भातसा धरणात ६९१.१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून धरण ७३.३७ टक्के भरले आहे. दरम्यान, सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे पाच दरवाजे ७५ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून धामणी व कवडास धरणातून एकूण ३७,३०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे.
धामणी धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर, तर कवडास धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे.धरणांमधून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या ६५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.