

भिवंडी (ठाणे) : संजय भोईर
छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर हे सर्वांना प्रेरणा देणारे आहे त्यासाठी या स्थळाला राज्य शासनाकडून पर्यटनस्थळ म्हणून आम्ही घोषित करू असे सांगत या देशात औरंगजेबाच्या कबरीचा महिमा मंडण होऊ देणार नाही, जो कोणी तसे करण्याचा प्रयत्न करेल त्याला चिरडून टाकू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. ते मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार महेश चौघुले, दौलत दरोडा, निरंजन डावखरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, बालयोगी सदानंद महाराज, श्रीराम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व्यासपीठावर आदी मान्यवर उपस्थित होते.
या देशामध्ये महिमा मंडण होईल तर ते फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरीचा होणार नाही. 50 वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची आहे हे आमचे दुर्दैव असल्याचे सांगत ज्याने आमच्या हजारो लोकांना मारलं, त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावा लागत आहे. पण काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडण होऊ देणार नाही आणि जो कोणी असा करेल त्यांना चिरडून टाकू, असे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.