

BJP Navi Mumbai Airport Stand
नेवाळी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रश्न हा भूमिपुत्रांच्या अस्मितेचा आहे. या प्रश्नावर ठाकरे सरकारच्या काळात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. आंदोलन, मोर्चे आणि सभांमधून भाजप नेत्यांनी तत्कालीन सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आज केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असताना त्याच आक्रमकतेची धार कुठे हरवली, असा थेट सवाल भूमिपुत्र भाजपाला विचारत आहेत.
दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनानंतर २७ गाव सर्व पक्षीय समितीने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून केंद्रात सुरु असलेल्या पाठपुराव्याची माहिती समितीने घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या मागणीसाठी मुंबई सह ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. या लढ्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदार सहभागी झाले होते. मात्र, दि. बा. पाटील यांच्या नावासाठी पूर्वी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपचा एकही खासदार अथवा आमदार आंदोलनाच्या ठिकाणी दिसला नाही. विरोधात असताना रस्त्यावर उतरणारे आणि सत्तेत आल्यानंतर शांत बसणारे राजकारण भूमिपुत्रांना अपेक्षित नसल्याची भावना दिल्लीत थेट भूमिपुत्रांनी व्यक्त केली होती.
सत्तेपूर्वीचा संघर्ष आणि सत्तेनंतरची शांतता, हा योगायोग आहे की बदललेली भूमिका ? भाजपने याचे स्पष्ट उत्तर द्यावे. कारण विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना नामकरणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आता घोषणा नव्हे, तर केंद्राकडून ठोस निर्णयाची गरज आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया भूमिपुत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रात भूमिपुत्रांच्या संघर्षात सातत्याने सोबत राहिलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष हक्क समितीने भेट घेतली आहे. केंद्र स्तरावरील पाठपुराव्याची माहिती घेऊन पुढील लढ्याच्या दिशेवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी समितीचे पदाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक महेश गायकवाड देखील उपस्थित होते.