

डोंबिवली शहर : संस्कृती शेलार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेट घेण्याच्या दिशेने जात आहे. डोंबिवलीजवळील काटई गावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान ‘दि. बा. पाटील’ यांच्या नावाचा जयघोष सातत्याने होत असून, या मागणीने पुन्हा वेग घेतला आहे. हरिनामाच्या गजरात भूमिपुत्रांच्या हक्काचा आवाज उठत असून, धार्मिक मंचावरून पुन्हा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे.
सात दिवस चालणाऱ्या काटई किर्तन सेवा सप्ताह महोत्सवात श्रद्धा आणि समाजकारणाचा संगम साधला जात आहे. दररोज कीर्तन, प्रवचन, भजनांच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना उजाळा दिला जात आहे. मात्र, यंदा भक्तीभावाबरोबरच ‘दि. बा. पाटील विमानतळ’ या मागणीचा स्वर अधिक प्रखर झाला आहे. शुक्रवारी (दि. 18 ऑक्टोबर) सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्तनकार महाराज आणि ग्रामस्थांनी एकमुखाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा ठाम आग्रह व्यक्त केला. संविधानिक मार्गाने पुढील आंदोलन उभारण्याचा निर्धारही या वेळी करण्यात आला. “दि. बा. जागर” या उपक्रमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत या मागणीची जाणीव पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी दि. बा. पाटील यांच्या शेतकरी, कामगार आणि भूमिपुत्र चळवळीतील योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करत सांगितले, “भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणाऱ्या त्या नेत्याचं नावच या भूमीच्या आकाशात झळकायला हवं!” या उद्गारांनंतर गावकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
‘दि. बा. पाटील’ नावाच्या समर्थनाचा स्वर अधिक तीव्र होणार
काटईसह आसपासच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये या विषयावर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. सप्ताहाची सांगता रविवारी होणार असून, या दरम्यान दररोजच्या कीर्तनांतून ‘दि. बा. पाटील’ नावाच्या समर्थनाचा स्वर अधिक तीव्र होणार आहे. राजकीय वर्तुळातही या हालचालींकडे लक्ष वेधले जात असून, विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दि. बा. पाटील विमानतळ नामकरणासाठी बैठक
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दि. बा. पाटील यांच्या नावावर करण्यासाठी कृती समितीद्वारे रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 4 वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, वाशी सेक्टर-1/अ येथे बैठक आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांकडून केंद्र सरकारकडे नियमावली मसुदा त्वरीत पाठवण्याची मागणी, निवडणूक आचार संहिता लागू होण्याआधी नामकरण मंजूर होणे, राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्च काढण्याची शक्यता आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच विमानतळाच्या उद्घाटनावेळी दि. बा. पाटील यांच्या कार्याची स्तुती झाली, परंतु नामकरणाविषयी निर्णय न घेतल्यामुळे भूमिपुत्रांमध्ये नाराजी व्यक्त झाली होती.