

टोकावडे: मुरबाडच्या सार्वजानिक बांधकाम विभागातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकासकामे सुरू असून मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च केला जात आहे. मात्र ना वस्ती, ना रस्ता, ना गाव, तरी देखील नऊ मोऱ्यांसाठी दहा लाख रुपये निधी खर्च केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जांभुळवाडी, भांगवाडी, वडाची वाडी ही गावे असून याच रस्त्याला माळ शासकीय आश्रम शाळा देखील आहे. मात्र माळ शासकीय आश्रम शाळेच्या मागील बाजूस कोणतीच वस्ती नसून संबंधित विभागाने सहा मोऱ्यांसाठी सुमारे दहा लाख रुपयांचा निधी खर्च केला असल्याची बाब समोर आली आहे.
शासनाच्या निधीची मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. शासकीय निधीचा योग्य वान न होता अनावश्यक ठिकाणी निधी खर्च होत असल्याची तक्रार विविध संघटनांनी केली आहे. याबाबतच्या तक्रारी स्थानिक संघटनांनी केल्या आहेत.
नेमकी कामे कोण निश्चित करते आणि कशासाठी करते, याचा लोखाजोखा मांडून याबाबतच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या जाणार असल्याचे रवींद्र चंदने यानी सांगितले आहेत. झालेल्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात येत असून प्रत्यक्ष गरजेचा किंवा लोकवस्तीचा संबंध असलेल्या ठिकाणी निधी खर्च व्हावा अशी माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
एवढा मोठा निधी खर्च करण्यात आल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची गरज, नियोजन व मंजुरी प्रक्रियेबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबतच्या चौकशीची मागणी आरपीआय सेक्युलरचे रवींद्र चंदने यानी केली आहे.