

ठाणे : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा त्याच रेल्वे मार्गावर लोकल दुर्घटना थोडक्यात टळली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बदलापूरकडे जाणारी लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकातून रवाना होत असताना, लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या ४६ वर्षीय महिलेचा तोल जाऊन ती लोकलमधून खाली पडल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती लोकलमधून प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवाश्यांनी दिली.
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेला तब्बल चार महिने उलटले; परंतु मध्य रेल्वे प्रशासनातर्फे कोणताही योग्य निर्णय मुंब्रा-दिवा रेल्वे मार्गावर घेण्यात आलेला नाही. अपघात टाळण्यासाठी मंत्रा-दिवा रेल्वे मार्गावर क्रॉसिंगच्या वेळी लोकल रेल्वेचा वेग तात्पुरता कमी करून पुढे रवाना कराव्यात, अशी अजब उपाययोजना मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे; परंतु अशा उपाययोजनांमुळे रेल्वे मार्गावर काहीच फरक पडल्याचे दिसून येत नाही.
दिलेल्या माहितीनुसार लोकलमधून पडलेली महिला दादर स्टेशनवरून कल्याण अशी प्रवास करत होती. प्रवास करत असताना संध्याकाळी सुमारे ८.१२ च्या दरम्यान त्यांनी दादर स्टेशनवरून बदलापूर लोकल पकडली व डब्यामध्ये अगोदरच प्रचंड महिला प्रवाश्यांची गर्दी असल्यामुळे ही महिला लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करत होत्या. दरम्यान लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकातून रवाना होऊन मधला वळणाच्या जागी क्रॉसिंगसाठी रेल्वे मार्गावर लोकलचा वेग कमी करण्यात आला असता डब्यातील गर्दीमुळे महिलेचा तोल जाऊ न रेल्वे ट्रॅकवर पडली; परंतु सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्यामुळे महिलेला जास्त दुखापत झाली नाही. तत्काळ इतर महिला प्रवाश्यांनी या महिलेला मदत करून लोकलमध्ये चढवून तिला दिवा रेल्वे स्थानकावर सुखरूप उतरवले. महिला प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पडलेल्या महिलेच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे दुर्घटना टळतील का?
रेल्वे प्रशासनाच्या अशा तात्पुरत्या उपाययोजनांमुळे रेल्वे दुर्घटना टळतील का? असा सवाल प्रवाश्यांनी उपस्थित केला आहे. वारंवार रेल्वे प्रशासनाची डोळेझाक वृत्तीमुळे प्रवाशांना अशा रेल्वे अपघातांना सामोरे जावे लागते. इतका मोठा अपघात होऊनही रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत. रेल्वे प्रशासनाने होणारे मोठे अपघात टाळण्यासाठी जसे तात्पुरत्या ट्रेन स्लो करण्याचा निर्णय बऱ्याच प्रवाश्यांना पटलेला नाही. रेल्वे प्रशासनाने असे तात्पुरते नियोजन न करता एखादी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी प्रवाश्यांनी मागणी केली आहे. तात्पुरत्या नियोजनाने एखादा होणारा अपघात टाळू शकत नाही असे देखील प्रवाश्यांकडून सांगण्यात आले