

High Tide Warning Mumbai, Konkan Arabian Sea
ठाणे : मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 24 ते 27 जुलै दरम्यान समुद्रात मोठी भरती येणार असल्याने नागरिकांना समुद्राजवळ जाण्यापासून रोखण्यात आले आहे.
सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहर आणि कोकण किनारपट्टीला सध्या मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच येत्या 24 ते 27 जुलै 2025 दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार असल्याने मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.
भरतीच्या काळात नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणार्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे वाहतूक कोंडी, जलभराव आणि सार्वजनिक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. समुद्रालगत राहणार्या लोकांनी सावध राहावे आणि मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामीण भागात वीज किंवा झाडे पडल्याने दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 24 जुलै 2025 ते रविवार, 27 जुलै 2025 या कालावधीत सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच 26 जुलै 2025 रोजी दुपारी 1.20 वाजता समुद्रात सर्वाधिक 4.67 मीटर उंचीची लाट उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अशी सूचना महापालिकेने दिली आहे.
उत्तर अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळेच आज कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळलेला असून, किनारी भागात ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी तरीही सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवार, 25 जुलै 2025
दुपारी 12.40 वाजता 4.66 मीटर
शनिवार, 26 जुलै 2025
दुपारी 01.20 वाजता 4.67 मीटर
रविवार, 27 जुलै 2025
दुपारी 01.56 वाजता 4.60 मीटर