ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई, ठाणे परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे रस्ते-रेल्वे वाहतूक कोलमडत असली तरी वरुणराजाच्या या कृपेनं मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्यापैकी मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या प्रमुख ७ तलावांपैकी एक असलेला मोडकसागर गुरुवारी (२७ जुलै) रात्री १०. ३० च्या दरम्यान ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
काल तानसा आणि तुळशी तलाव 'ओव्हर फ्लो' झाले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जलविभागाचं लक्ष मोडकसागरकडे लागले होते. ते भरून वाहण्यासाठी फक्त काही मीटरची पातळी शिल्लक होती आणि त्यासाठी वरुणराजाने फार वाट पाहायला लावली नाही. गेल्या तीन दिवसापासून विरार-वैतरणा पट्ट्यात पावसाने जोर धरला आणि गुरुवारी (27 जुलै) रात्री १०.३० च्या दरम्यान मोडकसागर पूर्ण भरला. मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांची किमान फेब्रुवारी पर्यंत सोय झाली आहे. दरम्यान, वैतरणा नदीला पूर सदृश परिस्तिथी असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.