

ठाणे : महावितरणने ग्राहकांना विश्वासात न घेता सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जनतेचा हाच आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) ठाणे जिल्हा शाखेने २२ जुलै रोजी वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयावर भव्य 'जनआक्रोश मोर्चा' काढण्याची घोषणा केली आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे नेहमीपेक्षा जास्त वीज बिल येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी या मीटरला विरोध केला असता, महावितरणने राज्यभरात विशेष आदेश काढून स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक केले आहे. मात्र, ग्राहकांच्या हक्कानुसार त्यांच्या संमतीशिवाय मीटर बदलणे बेकायदेशीर असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
या पार्श्वभूमीवर, मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांवर होणाऱ्या या सक्तीविरोधात आणि महावितरणच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून महावितरण प्रशासनाकडे जनतेच्या प्रमुख १० मागण्या मांडल्या जाणार आहेत.