

ठाणे : कळवा, मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडविण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा, मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.
गणेशोत्सवात पाणीटंचाई होती. आता नवरात्रोत्सवातही पाणीटंचाई आहे. आम्ही तुम्हाला दसर्यापर्यंत मुदत देतो. जर, नवरात्रीच्या आत पाणी प्रश्न सुटला नाही, तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू, असा इशारा यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. कळवा व मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणीपुरवठा करताना ठाणे महानगर- पालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. याबाबत तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने बुधवारी डॉ. आव्हाड, शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे पालिकेत धडक दिली.
आव्हाड यांनी महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तर, कळवा-मुंब्रा परिसरातील पाणीटंचाईमागे राजकीय कारण असल्याचा आरोप केला. ही पाणीटंचाई सहन करण्याच्या पलीकडे असताना सत्ताधारीच मोर्चे काढताहेत. पाणी पुरवठा वाढविण्याचे सोडून मोर्चे कसले काढताय?, असा सवाल त्यांनी केला.
हव्यासामुळे ते धरण हातचे गेले
मेट्रोसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात. निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते. मात्र, पाण्यासारखी मूलभूत गरज भागविली जात नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, कळवा- मुंब्र्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणीपुरवठा होतोे. इतर भागांनी काय पाप केले. दलित, शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिले जात नसल्याचा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणले होते. पण, सत्ताधार्यांच्या हव्यासामुळे ते धरण हातचे गेल्याचे आ. आव्हाड म्हणाले.