

ठाणे: महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी 2 लाख 56 हजार कोटींच्या 18 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याकरिता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे तिसऱ्या मुंबईतील रायगड आणि चौथ्या मुंबईतील पालघर जिल्ह्याच्या विकासास मोठे बळ प्राप्त होणार आहे.
या एकूण गुंतवणूकीपैकी सर्वाधिक 1 लाख 23 हजार 131 कोटी रुपयांची गुंतवणूक रायगड आणि पालघर जिल्ह्यात होत असून, त्यातून या उभय जिल्ह्यामध्ये तब्बल 35 हजार 200 नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील एकूण 18 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यातील 4 अतिविशाल प्रकल्प रायगड व पालघर जिल्ह्यात आहेत.
या नव्या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा व राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्याच बरोबर राज्यात एकूण सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.
अनधिकृत पार्किंग हटवल्यास रस्ता रुंद होऊ शकतो. अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात ग्लोब फोर्ज लिमिटेड कंपनी 15 हजार 430 कोटींची गुंतवणूक करित असून त्यांतून 3 हजार 600 रोजगार निर्माण होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी न्यू एनर्जी प्रा. लि. कंपनी 27 हजार 595 कोटींची गुंतवणूक करत असून त्यातून 4 हजार रोजगार तर कायडॅक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मिलियन स्टील कंपनी 216 कोटींची गुंतवणूक करत आहे.
शिरुर येथे जबिल सर्किट इंडिया प्रा. लि.कंपनी 1 हजार 500 कोटींची गुंतवणूक तर तळेगांव येथे युरोबस इंडिया कंपनी 4 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. गडचिरोली जिल्ह्यात हरीओम पाईप इंडस्ट्रीज कंपनी 3 हजार 135 कोटींची गुंतवणूक करत आहे.
नाशिक जिल्ह्यात कन्क्युओसो कॉम्प्रेसर्स कंपनी 800 कोटींची तर अमरावती जिल्ह्यात टॅबो डिफेन्स प्रॉडक्ट कंपनी1 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासह तांत्रिक नवकल्पना, संशोधन विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.