

किन्हवली: किन्हवलीजवळील शिळ गावात एकाच कुटुंबातील 22 जणांना अन्नातून विषबाधा झाली असून पुढील उपचारासाठी त्यापैकी 21 जणांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात व एका व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सकाळी तयार केलेले अन्न संध्याकाळीही खाल्ल्याने 28 मे रोजी हा विषबाधेचा प्रकार समोर आला.
किन्हवली परिसरात शिळ या गावातील अशोक भोईर यांच्या मातोश्री बारकाबाई बाळू भोईर यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी (दि. 27) रक्षाविसर्जनाचा (राखाडी भरणे )विधी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित नातेवाईक पाहुण्यांसाठी जेवण बनवण्यात आले होते. त्यातील शिल्लक राहिलेले जेवण रात्री कुटुंबातील सर्वांनी खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखी, ताप असा त्रास होऊ लागला. रात्री नऊच्या सुमारास 22 जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.
तेथून पुढे 21 व्यक्तींना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात व हरि भोईर यांना सिव्हिल रुग्णालय ठाणे येथे हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.एच.राठोड यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी उन्हाळ्याच्यादिवसांत अन्न साठवणूक आणि स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विषबाधा झालेले रुग्ण
मंदा भालचंद्र भोईर (36), हरि नामा भगत (50), अलका हरि भगत (45 ), गिता अशोक भोईर (40), प्रिया अशोक भोईर (17 ), अनुष्का अशोक भोईर (11), सुभाष बाळू भोईर (53), मयूर सुभाष भोईर (22), नितीन सुभाष भोईर (24), हरि दाजी भोईर (64 ), कविता किसन शिंगोळे (42), राजश्री अनंता भोईर (46 ), गणेश अनंता भोईर (17 ), बाळू दाजी भोईर (80), सुमन सुभाष भोईर( 42), मंदा भानुदास भोईर (51), भानुदास भगवान भोईर (51 ), कल्पेश भानुदास भोईर (24 ), भालचंद्र भगवान भोईर (51), अशोक बाळू भोईर (52), अनंता हरि भोईर( 60 ) आणि अक्षता अशोक भोईर (17 )