

मनोज ताठे
खडवली: खर्डी ते कसारा दरम्यान उभारण्यात आलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम आता पूर्णत्वास गेले असून, येत्या 12 मेपासून या मार्गावर ओव्हरहेड वायरला वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच या मार्गिकेवर रेल्वे गाड्यांची चाचणी आणि नियमित वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या या मार्गावर लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या एकाच मार्गिकेवर धावत असल्यामुळे अनेकदा लोकल गाड्यांना सिग्नलवर थांबावे लागते. परिणामी, प्रवाशांना उशीर आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र, तिसरी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या नव्या मार्गिकेमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळणार असून, लोकल गाड्यांचा वेग आणि वेळापत्रक सुधारेल. यामुळे दररोज कामासाठी प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच कसारा घाट परिसरातील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होईल.
रेल्वे प्रशासनाच्या या प्रकल्पामुळे संपूर्ण मध्य रेल्वे मार्गावरील ताण कमी होणार असून, भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी ही मोठी पायरी ठरणार आहे. त्यामुळे कसारा मार्गावरील प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली असून, आता अधिक जलद, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची नवी आशा निर्माण झाली आहे.