

सतीश तांबे
कल्याण: कल्याण तालुक्याचे प्रस्तावित जिल्ह्यात रूपांतर होण्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी झेप घेतली जात आहे. भिवंडी, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, शहापूर ते कर्जत-कसारा या परिसरांना जोडणारे द्रुतगती महामार्ग, मेट्रो, रिंग रोड, डबल डेकर रस्ते आणि रेल्वे मार्गांचे जाळे वेगाने विस्तारत असून यामुळे येत्या काही वर्षांत कल्याणच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
शहराच्या विकासात दर्जेदार रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारलेले महामार्ग, मेट्रो आणि रेल्वे सेवा नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहेत. या सुविधांमुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि सुलभ झाला असून उद्योग-व्यवसायालाही नवे बळ मिळत आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या जवळ असल्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात झपाट्याने नागरीकरण झाले आहे. या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबई-ठाण्यात नोकरीसाठी प्रवास करतात. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण वाहतूक व्यवस्थेवर येत असल्याने शासनाने रस्ते व दळणवळणाच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे.
कल्याण तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते कल्याण-मुरबाड, कल्याण-भिवंडी, कल्याण-शीळ, कल्याण-बदलापूर आणि मलंग रोड यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले आहे. पूर्वी अरुंद असलेले हे रस्ते आता दुहेरी ते सहा पदरी सिमेंट काँक्रिट रस्त्यांमध्ये रूपांतरित झाले आहेत. कल्याण-मुरबाड मार्ग माळशेजपर्यंत चार पदरी करण्यात आला असून कल्याण-भिवंडी-शीळ मार्ग सहा पदरी झाला आहे.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली परिसरात रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दुर्गाडी ते टिटवाळा या रिंग रूटचे अनेक टप्पे पूर्णत्वाच्या मार्गावर असून टिटवाळा ते गोवेळी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. डोंबिवली ग्रामीण भागातील रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे.
तसेच, एरोली-कल्याण टनेल, शीळ-नेवाळी 100 फूट रस्ता आणि खोणी-तळोजा मार्गामुळे नवी मुंबई आणि पनवेलकडे जाणारा प्रवास अधिक जलद होणार आहे. मुंबई-बडोदा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतूक सुलभ होणार आहे. या महामार्गांना जोडणारा एक्सेस कंट्रोल रिंग रोड उभारण्याची मागणीही पुढे आली असून त्यालाही गती मिळण्याची शक्यता आहे.
रेल्वे क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू झाले आहे. तसेच कल्याण-ठाणे सहावी लाईन, कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा तिसरी लाईन प्रकल्पांमुळे उपनगरी रेल्वेवरील ताण कमी होणार आहे.
मेट्रोचे विस्तारित जाळे; उपनगरांना नवी दिशा
मध्य रेल्वेवरील वाढत्या प्रवाशांच्या ताणाला पर्याय म्हणून मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर असून हा मार्ग पुढे बदलापूर, अंबरनाथ आणि टिटवाळा पर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे.
तसेच कांजूरमार्ग ते बदलापूर, कल्याण-तळोजा आणि तळोजा-शीळ मार्गे मुंब्रा-कलवा जोडणाऱ्या मेट्रो लाईन्स प्रस्तावित आहेत. यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर आणि टिटवाळा हे संपूर्ण उपनगर मेट्रो नेटवर्कने जोडले जाणार आहे.
औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या तळोजा, अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाणे परिसरांना या प्रकल्पांचा मोठा फायदा होणार आहे. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ, एमटीएचएल आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून मालवाहतूक सुलभ होणार आहे.