

कल्याण: केंद्र सरकारच्या हवा गुणवत्ता कार्यक्रमां तर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतल 3 ठिकाणी बाह्य हवा शुद्धीकरण प्रणाली नुकतीच कार्यान्वीत करण्यात आली आहे. कल्याणमधील टाटा नाका, 100 फूटी रस्ता आणि वाणी विद्यालयासमोर ही प्रणाली कार्यान्वीत केली आहे. ही प्रणाली कार्यान्वीत केल्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्या रोहणी लोकरे यांनी सांगितले की, कार्यान्वीत करण्यात आलेले यंत्र हे स्थिर यंत्र आहे. हे प्रदूषित हवा आत खेचून त्यातील धूळ, सूक्ष्म कण आणि हानिकारक प्रदूषक फिल्टर करून स्वच्छ हवा पुन्हा वातावरणात सोडते.
उच्च कार्यक्षमतेच्या फिल्ट्रेशन आणि व्हेंटिलेशनने सुसज्ज असलेली अत्यंत उपयुक्त आहे. ही प्रणाली सतत कार्यरत राहून हवेतील प्रदूषक घटक कमी करते आणि अधिक स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत करते. कार्बन फिल्टरद्वारे प्रभावीपणे प्रदूषण नियंत्रणात आणते. हानिकारक वायू सतत कमी करते.
स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टम असल्याने लाईव्ह एअर क्वालिटी ट्रॅकिंगसाठी सेन्सर्सशी जोडता येते. ही प्रणालीअतिशय कमी पाण्याचा वापर करते. धूळ नियंत्रण प्रभावीपणे करते.वातावरणातील तापमान कमी करण्यास आणि थंडावा निर्माण करण्यास मदत करते. ही या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत.
राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेस केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला. त्या निधीतून ही प्रणाली कार्यान्वीत केली आहे. ज्या कंत्राटदारामार्फत ही प्रणाली कार्यान्वीत केली आहे. त्याच कंत्राटदाराकडून तीन वर्षे देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.