

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील गणेशघाट भागातील प्रेम ऑटो चौकात परिसरातील नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या शासकीय कॅमेऱ्यांच्या मुख्य नियंत्रण पेटीतील कॅमेऱ्यांच्या १६ बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. अशाप्रकारे बॅटऱ्या चोरून यंत्रणा बंद पाडणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुध्द कॅमेरा नियंत्रक कंपनीने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमतील वैकुंठधाम स्मशानभूमी भागातील गणेशघाट भागात प्रेम ऑटो चौकात एका कंपनीने परिसर नियंत्रणासाठी शासकीय कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिसराचे नियंत्रण केले जाते. या नियंत्रण ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांच्या मुख्य नियंत्रण पेटीतील एकूण १६ बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान चोरून नेल्या आहेत. या बॅटऱ्यांची बाजार भावाची किंमत ८० हजार रूपये आहे.
कॅमेऱ्यातील बॅटऱ्या काढून नेल्यानंतर त्या भागातील यंत्रणेवर परिणाम झाला. याची माहिती कंपनी नियंत्रकांना समजताच त्यांनी मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी केली. चोरट्यांनी विजेऱ्या चोरून नेल्याचे लक्षात आले. कॅमेरा नियंत्रण कंपनीचे अधिकारी शिशीर भोगले यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हवालदार साळुंखे या प्रकरणाचा तपास करत आहेत. चोरट्यांनी या बॅटऱ्या भंगारवाल्यांना विकण्यासाठी चोरून नेल्याचा संशय पोलिसांना आहे.