

कल्याण : - नीट आणि टीएटी परिक्षा पेपर फुटीचे प्रकरण ताजे असताना उच्च न्यायालयाच्या लिपीक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या कल्याणमधील परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने परिक्षार्थींनी मनस्ताप सहन करावा लागला. मात्र राज्यभरातील सगळ्याच परिक्षा केंद्रावर ही परिस्थिती उद्धवली असल्याने परिक्षार्थींनी परिक्षा आयोजना विषयी तीव्र संताप व्यक्त केला. अखेरीस कल्याणच्या परिक्षा केंद्रावर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्याठिकाणी कल्याण न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही पाचारण करण्यात आले.
उच्च न्यायालयातील ८०० लिपीक पदासाठी आज परिक्षा आजोजित करण्यात आली होती. राज्यभरात विविध ठिकाणी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. जवळपास ७ हजार उमेदवारांनी लिपिक पदासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ५०० उमेदवारांची परिक्षा कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परिक्षा केंद्रात होती. परिक्षा केंद्रावर विद्यार्थी पाेहचले.
५०० परिक्षार्थींची परीक्षा तीन ब’चमध्ये घेतली जाणार होती. परीक्षा दिल्यावर लगेच त्याचा निकाल येणार होता. मात्र परीक्षा केंद्रात सर्व्हरच डाऊन होते. काही परीक्षा रुममध्ये अंधार होता. काहींच्या संगणकाचा किबोर्ड नीट काम करीत नव्हता. त्यामुळे परीक्षा दिल्यावर निकालाची प्रिंट येत नव्हती. या विविध समस्यांचा समाना करावा लागल्याने पहिली बॅच परीक्षा रुममध्ये गेली ती लवकर परत आली नाही. त्यामुळे दुसऱ्या आणि तीसऱ्या बॅचची मुले साडे तीन वाजेपर्यंत बाहेरच ताटकळत होती. हा गोंधळ परिक्षा केंद्रावर उडाल्याने त्याठिकाणी पोलिसांना पाचारण करावे लागले. अखेरीस कल्याण न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही पाचारण केले. परिक्षा रद्द करुन नव्याने घेणार की नाही ? याविषयी काही ठोस माहिती समोर आलेली नाही. या सगळ्या प्रकारामुळे परिक्षा देणऱ्याा परिक्षार्थींच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.