

अंबरनाथ: अंबरनाथ आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एक लोखंडी पेटी दिसल्याने एकच घबराट पसरली होती. परंतु मोटरमनच्या सतर्कतेमुळे रेल्वे चा हा मोठा अपघात टळला आहे.
मंगळवारी पहाटे ठाण्याहून कर्जत च्या दिशेने येणारी लोकल उल्हासनगर -अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आली तेव्हा पटरीवर एक लोखंडी पेटी असल्याचे मोटरमन च्या निदर्शनास आले. तेव्हा पहाटे ५.४४ मिनिटांनी त्यांनी मोठ्या सतर्कतेने गाडी थांबवली.
या गाडीवर मोटरमन आर. एस. सैनी होते. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही पेटी तातडीने रुळावरून बाजूला करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी ही पेटी ताब्यात घेतली असून हा कोणत्या घातपाताचा प्रकार होता का याबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे पहाटे ५.४४ ते ५.५६ असा सुमारे १२ मिनिटे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होती.