

डोंबिवली : डोंंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला होणारा पाणी पुरवठा आज बुधवारी तातडीच्या देखभाल/दुरुस्तीच्या कामाकरिता दुपारी 1 ते संध्याकाळी 6 दरम्यान या पाच तासांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय केडीएमसीकडून घेण्यात आला आहे. डोंबिवलीकरांनी या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
डोंबिवलीला उल्हास नदी काठच्या मोहिली येथील उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी कल्याण पश्चिमेकडून बैलबाजार, गोविंदवाडी, पत्री -पुलाकडून रेल्वे मार्गाखालून नेतिवलीच्या टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. उल्हास नदीतून उचललेले पाणी नेतिवलीच्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून त्यानंतर डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला वितरीत करण्यात येते.
पावसाळी दिवसांत पाणी अशुद्ध असते. उल्हास खोर्यातील डोंगर-दर्यांतून वाहून आलेला कचरा, गाळ आणि पालापाचोळा नदीत विसर्जित होतो. उल्हास नदीकाठच्या कल्याण पश्चिमेतील मोहिली येथे हे पाणी उदंचन केले जाते. हे पाणी उंदचन केंद्रातील सयंत्रातून गाळून घेताना तांत्रिक समस्या उद्भवतात. सतत उदंचन करण्यात येणार्या पाण्यातील कचरा, गाळ व पालापाचोळ्याचा निचरा करताना उंदचन केंद्रातील सयंत्रे जाम होऊन वेळप्रसंगी ती बंद देखील पडतात. अनेकदा तर गाळाने जाम झाल्यास सयंत्रांचा पाणी उचलण्याचा वेग मंदावतो. असे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी उदंचन केंद्र बंद ठेवावी लागतात.
अशी तातडीची कामे पूर्ण करण्यासाठी केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाला उल्हास नदीच्या काठी असलेली उदंचन केंद्रे बंद ठेवावी लागतात. ही केंद्रे बंद ठेवल्यास या केंद्रांवर अवलंबून असलेली जलशुद्धीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात. बुधवारी अशाच देखभाल/दुरुस्तीच्या कामाकरिता मोहिली उदंचन केंद्र बंद राहणार असल्याने या केंद्रावर अवलंंबून असणारे नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
या भागात पाणीपुरवठा बंद
पूर्वेकडील पाथर्ली, ठाकुर्ली, चोळे, 90 फुटी रोड, भोईरवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, गोग्रासवाडी, अयोध्यानगरी, फडके रोड परिसर, सुनीलनगर, जुना/नवा आयरे रोड, राजाजी पथ, म्हात्रेनगर, रेल्वे स्थानक परिसर, पश्चिमेकडील विष्णूनगर, मोठागाव, ठाकुरवाडी, कोपर, शास्त्रीनगर, जयहिंद कॉलनी, सुभाष रोड, नवापाडा, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, उमेशनगर, चिंचोड्याचापाडा, गणेशनगर, रेल्वे वसाहत परिसर, भागशाळा मैदान या परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.