

नेवाळी : डोंबिवलीच्या सोनारपाडा माणगाव परिसरात भूमिपुत्र महिलांना उद्योजकाच्या महिला बाउन्सरांकडून मारहाण झाली होती. हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाज बांधवांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.
विशेष बाब म्हणजे या विकासकाने थेट आगरी समाज आणि २७ गावांना आव्हान दिले होते. त्यामुळे आगरी समाजाकडून या बिल्डरसह त्याच्या अन्यसाथीदारांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या बिल्डरला मुंबई उच्च न्यायालय परिसरातून अटक करण्यात आली असून अन्य एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. त्यानंतर भूमिपुत्रांनी मानपाडा पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
सोनारपाडा माणगाव येथील ठाकूर कुटुंबीयांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापले होते. या घटनेत भूमिपुत्र महिलांवर बाहेरून महिला बाऊन्सर आणून हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाणे, रायगड, पालघर तसेच मुंबई परिसरातील भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
आरोपींच्या अटकेसाठी आणि कठोर कारवाईसाठी भूमिपुत्रांनी डोंबिवलीच्या पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात सागरी भूमिपुत्रांची बैठक घेतली होती. या बैठकीत मानपाडा पोलिसांवर नाराजी व्यक्त करण्यात आले होती. त्यानंतर आता मुख्य आरोपीसह अन्य एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी आता तपासाला वेग दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर अन्य आरोपींना देखील अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
खरे म्हणजे समाजाची मूठ काय असते ती या माध्यमातून दिसून आली आहे. आमच्या समाजातल्या महिलांवर झालेला अत्याचार जो ज्या पद्धतीने गुंडगिरी केली. समाजाने, सर्व संघटनांनी एकत्र येऊन ज्या प्रकारे लढा दिला आज आम्ही पोलीस प्रशासनाचे आभार मानायला आलो. कारण जो मुख्य आरोपी होता तो देखील अटक झाला आहे. तसेच प्रकरणातील तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे आम्हाला साथ दिल्ली आणि समाजाला सहकार्य केल आणि मुख्य आरोपीला अटक केली. आमची त्यांच्याकडे एकच मागणी आहे. उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना आपण अटक करून कठोर कारवाई करावी.
विजय जोशी आगरी सेना, जिल्हाप्रमुख
सोनारपाडा माणगाव येथे भूमिपुत्रांवर जो हल्ला झाला आहे, परप्रांतीयांनी येऊन चाळीस ते पन्नास हस्तकांच्या सहाय्याने हल्ला केला होता. या समाजाला एक प्रकारे स्थानिक रहिवाशांना आणि २७ गावांना त्यांनी आव्हान दिले होते की कोणीही आणा आम्ही आमचं साध्य करूच परंतु यामध्ये असं झालं सर्व भूमिपुत्र समाज एकत्र झाला. या विषयाच्या विरोधात आणि सुरुवातीला प्रत्येकाची इच्छा एकच होती की पोलीस प्रशासनाने जशी प्रकरणाची गंभीर्याने दखल घ्यायला हवी होती, तशी गंभीर दखल घेतली गेली नाही. परंतु सर्व समाज, नेते, संघटना एकत्र झाल्या हे एकीचे बळ समाजाचे दिसले. सर्वांनी मिळून पोलीस प्रशासनाला विनंती केली आमच्या समाजाच्या विरोधात बोलणारा जो बिल्डर आहे. मुळात हा कोणत्या समाज किंवा परप्रांतीय असा वाद नाही. ती एक प्रकारची प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला जाहीर विरोध करतो आणि यांच्या पुढे जे परप्रांतीय बिल्डर असतील त्यांनी आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय केला, तर गाठ आमच्याशी आहे.
सुमित वझे उपाध्यक्ष, २७ गाव संरक्षण हक्क समिती