

Railway crossing bridge Dombivli
कल्याण : डोंबिवली पश्चिम येथील रेतिबंदर रोडवरील रेल्वे क्रॉसिंग वरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी केडीएमसीने निविदा (टेंडर) जाहीर केल्याने येत्या काही महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
डोंबिवली पश्चिम व पूर्व भागांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, सध्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत नागरिकांना दीर्घकाळ थांबावे लागते, ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर तसेच आपत्कालीन सेवांवरही होतो. या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक नगर सेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय प्रशासनाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडला गेला. प्रारंभी प्रस्तावित असलेला हा उड्डाणपूल दोन लेनचा (2-लेन) होता; मात्र दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे आता हा उड्डाणपूल चार लेन (4-लेन) स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे.
पालिका प्रशासनाने या उड्डाण पुलाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली असून, प्रकल्पाचा कालावधी सुमारे २४ महिन्यांचा प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलामुळे भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून अधिक सक्षम रस्ते व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होईल. तसेच नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल.
डोंबिवली शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव सुधारणा घडवून आणणारा हा प्रकल्प ठरणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.