

मिरा रोड : मिरा भाईंदर मध्ये झालेल्या मराठी स्वाभिमान मोर्चाला पोलीस परवानगी नाकारल्याने मराठी माणसाचा आक्रोश रस्त्यावर दिसून आला. या आक्रोशाला पोलीस अधिकार्यांना जबाबदार धरून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त मधुकर पाण्डे यांची उचलबांगडी केली. आज पुन्हा पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड यांची नागपूरला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
मिरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापार्यांना मोर्चा काढून दिल्यानंतर मराठी एकीकरण समितीला मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे 8 जुलैला मिरा भाईंदरमध्ये मराठी माणसांसह मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि मराठी संघटनांनी मोर्चा काढला. हे प्रकरण पोलिसांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे चिघळले आणि मराठी जनसमुदाय रस्त्यावर उतरला. त्याचा फटका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील बसला.
त्यानंतर मंत्री सरनाईक यांनी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारून चूक केल्याच्या गंभीर आरोप करीत मुख्यमंत्र्याकडे पोलिस उपायुक्त गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी केल्यानंतर मिरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने उचलबांगडी केली. मात्र उपायुक्त गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नव्हती. अखेर आज उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची बदली नागपूर येथील राज्य गुप्त विभागात केली आहे. याप्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली होण्याची शक्यता आहे.
मिरा रोड येथे मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दुकानदारांच्या वतीने मिरा रोड येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलीसांनी परवानगी तर दिली नाही. परंतु मोर्चाच्या आदल्या दिवसापासूनच मराठी भाषिक व कार्यकर्त्यांना घरातून उचलून घेवून गेले. तसेच मोर्चाच्या दिवशी सुध्दा पोलीस दहशतवाद्या प्रमाणे मोर्चेकर्यांनी उचलुन घेवून जात होते. या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. पोलीसांनी दडपशाही केल्यामुळे हे आंदोलन चिघळले. या आंदोलनामुळे शासनाविरोधात देखील नागरिकांनी संताप व्यक्त केला.