

ठाणे : ठाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यात डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे 336 रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी ठाणे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात तापाचे आणि सर्दीच्या रुग्नांमध्ये वाढ होत असल्याने हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. दरम्यान या आजारांचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने यासंदर्भात उपाय योजना तसेच जनजागृती करण्यात येत आहे.
पावसाळा सुरु झाला कि साथ रोगांचे रुग्ण वाढत असतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांच्या रुग्णांचा समावेश असून खासकरून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी पालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाय योजना करण्यात येत आहे. पालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या रेकॉर्ड नुसार जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यात डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे 336 रुग्ण आढळले आहे.
सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसल्याचे पालिकेच्या अहवालामधून स्पष्ट झाले आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी यापेक्षा जास्त असण्याची शक्यता असल्याने रुग्णांचा हा आकडा मोठा होण्याची शक्यता आहे.
डेंग्यूची लक्षणे
तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस यांपैकी कोणतीही लक्षणं असतील, तर डेंग्यू झालेला असू शकतो.
डेंग्यूच्या जनजागृतीसाठी पालिकेची बॅनरबाजी
डेंग्यूच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध महत्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. या बॅनर्सच्या मध्यमातून आजारांची लक्षणे कशी ओळखावी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आजार होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे याची माहिती देण्यात आली आहे.
डेंग्यूचा आजार कसा होतो
डेंग्यूचा विषाणू डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. डासांच्या या प्रजाती चिकनगुनिया, येलो फीव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. डेंग्यू उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या सर्व ठिकाणी पसरतो. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.
काय काळजी घ्यावी
आपल्या घराच्या जवळ किंवा इमारतीत, चाळीत, वस्तीत पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. कुठे डबकी तयार झाली असतील, तर ती बुजवावीत. तसंच, कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.घरातल्या टाक्या, कळशा किंवा पाणी साठवण्याची भांडी झाकलेली असतील, याची काळजी घ्या. तसंच, त्यातलं पाणी ठरावीक दिवसांनी बदलावं. डास घरात येऊ नयेत म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. आवश्यकतेनुसार कीटकनाशकं, कॉइल्स आदींचा वापर करावा. शाळा, तसंच कामाच्या ठिकाणीहीही काळजी घ्यावी. घराभोवती आणि घरातही स्वच्छता राखावी.