

आसनगाव ः शहापूर तालुक्यातील डोंगरदर्यांमध्ये वसलेल्या लेनाड गावाजवळ वाहणार्या लेनाड नदीवर सुमारे 50 ते 60 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ऐतिहासिक पूल आजही ताठ मानेने उभा आहे, पण त्याची अवस्था दिवसेंदिवस खचत चालली आहे. सुमारे 50 ते 60 वर्षांपूर्वी भक्कम दगडी बांधकामाच्या साहाय्याने उभारण्यात आलेला हा पूल सध्या अखेरच्या घटका मोजत आहे.
पूलाच्या माध्यमातून या पूलाने केवळ वाहतूकच नव्हे तर शेतकरी, व्यापारी, आणि गावकरी यांना सहज संपर्काची सुविधा दिली होती. आजही परिसरातील हजारो वाहने, प्रवासी व परिसरातील नागरिक याच मार्गाने प्रवास करतात, परंतु पूल सध्या पूर्णपणे जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आहे. या पुलाचे संरक्षण कठडे निखळून पडल्याने पुलावरून प्रवास करणे वाहन चालकांना जिकिरीचे बनले आहे. याशिवाय पुलावर भले मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविणत येत आहे.
पूर्वीचा शहापूर लेनाड मार्गे मुरबाड जिल्हामार्ग शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ए. आठ वर्षांपूर्वी मंजूर झाल्याने हा पुल व रस्ता सार्वजनिक बांधकाम वेगाने विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित केला होता. लेनाड नदीवरील पूल याच राष्ट्रीय महामार्गावर उभा असून राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न मिटल्यानंतर शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक जीर्ण अवस्थेत असलेले सापगांव येथील भातसा नदिवरील पुल आणि लेनाड नदीवरील पूल निष्कासित करण्यात येणार आहेत.
मात्र शहापूर खोपोली महामार्गाचे काम गेल्या आठ वर्षापासून अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने येथून रोज ये जा करणार्या हजारो प्रवाशांना आजही ऐतिहासिक पुलांवरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.भविष्यात सावित्री नदीच्या पुल दुर्घटनेची, आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुलावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष भूमिका घेण्याची गरज आहे.
सदरचा जिल्हा मार्ग व पूल शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
बळवंत कांबळे, उपअभियंता - सा.बा. विभाग शहापूर