Dahisar to Kashigaon Metro : दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्यातील मेट्रो एप्रिलमध्ये धावणार
भाईंदर : राजू काळे
दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्पातील दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरु होण्यास मोठा विलंब लागत असल्याने ती केव्हा सुरु होणार, अशा आशयाचे वृत्त दैनिक पुढारीने 18 मार्च रोजी प्रसिद्ध केले होते.
त्याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या मेट्रोचे लोकार्पण येत्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
यापूर्वी या मेट्रोचे अनेक मुहूर्त हुकले होते. अखेर सरनाईक यांनी त्याचा मुहूर्त निश्चित केल्याने गेल्या दिड दशकापासून मिरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ते स्वप्न पुढील महिन्यात प्रत्यक्षात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो प्रवासाला थोडा विलंब झाला तरी चालेल पण प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य नसल्याचे त्यांनी मेट्रोच्या तांत्रिक पाहणीनंतर स्पष्ट केले.
दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाच्या सुरक्षिततेसंबंधी सर्व तांत्रिक प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून येत्या एप्रिल महिन्यात ही सेवा जनतेसाठी खुली होणार असल्याची घोषणा त्यांनी पाहणीवेळी केली. 2009 च्या निवडणूक वचननाम्यात दिलेले मेट्रोचे वचन पूर्णत्वास येत असल्याने 15 वर्षांच्या संघर्षाचे हे फळ मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार
पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गातील सर्व तांत्रिक कामे व तपासण्या पूर्ण झाल्या असून सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यास काही काळ लागल्याने मेट्रोच्या लोकार्पणाला विलंब झाल्याचा दावा त्यांनी केला. आता या टप्प्यातील सर्व अडथळे दूर झाले असून कोणत्याही संकटाच्या काळात मेट्रो यंत्रणा सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एका तासाला 4 हजार 500 म्हणजे दिवसाला जवळपास 50 हजार प्रवाशांना या मेट्रो मार्गिकेमुळे दररोज सुखकर, वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. तत्पूर्वी सध्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

