

ठाणे: डहाणू किनाऱ्यावरून सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडण्यात आलेल्या ‘धनलक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाने अवघ्या तीन महिन्यांत ओमानमार्गे पुन्हा रत्नागिरी किनाऱ्यापर्यंतचा प्रदीर्घ आणि वेगवान प्रवास पूर्ण केल्याची महत्त्वपूर्ण नोंद समोर आली आहे. या विलक्षण सागरी प्रवासामुळे कोकण किनारपट्टी ही ऑलिव्ह रिडले कासवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि नैसर्गिक अधिवासभूमी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
गतवर्षी 20 नोव्हेंबर रोजी डहाणूच्या समुद्रात धनलक्ष्मीला सोडण्यात आले होते. जखमी अवस्थेत सापडलेल्या या कासवावर डहाणू उपवन संरक्षक कार्यालयातील सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात जवळपास तीन महिने उपचार करण्यात आले होते.
उपचारानंतर तिच्या पाठीवर अत्याधुनिक सॅटेलाइट टॅग बसवण्यात आला, ज्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालींची नोंद घेणे शक्य झाले. विशेष म्हणजे, उपचारानंतर टॅग लावून समुद्रात सोडण्यात आलेल्या कासवांपैकी हे देशातील पहिले उदाहरण मानले जात आहे. समुद्रात सोडल्यानंतर पहिल्या पाच दिवसांतच धनलक्ष्मीने सुमारे 45 किलोमीटर अंतर पार केले.
त्यानंतर तिचा प्रवास दमण आणि गुजरात किनाऱ्याकडे सुरू झाला. डिसेंबर महिन्यात ती सोमनाथ परिसरातील समुद्रात आढळली, तर जानेवारीत पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात तिची नोंद झाली. पुढे ती अरबी समुद्र ओलांडत ओमानच्या दिशेने सरकली.
असा झाला प्रवास
20 जानेवारीपर्यंत ती किनाऱ्यापासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. 5 फेब्रुवारी रोजी ती 250 मीटर खोल पाण्यात डुबक्या मारताना आढळली, ज्यातून तिच्या अन्नशोध आणि सागरी वर्तनाची झलक मिळाली. 26 फेब्रुवारीला ओमानमधील मसीराह बेटाच्या सुमारे 160 किलोमीटर पूर्वेस तिची नोंद झाली. हे बेट उत्तर हिंदी महासागरातील कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे.
100 दिवसांत ओमानच्या सागरी हद्दीत पोहोचलेल्या धनलक्ष्मीने त्यानंतर आपली दिशा बदलत ईशान्येकडे परतीचा प्रवास सुरू केला. सागरी प्रवाह, तापमान आणि अन्नाची उपलब्धता यानुसार ती मार्गक्रमण करत राहिली आणि 20 दिवसांत तिने भारतीय किनाऱ्याकडे कुच केली.