ठाणे : उद्धव ठाकरे यांना ठाण्यातील दाढीची धास्ती असून याच दाढीने त्यांची गाडी खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. ठाकरे यांना केवळ मिमिक्री करणे एवढेच काम उरले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या ठाण्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा दाढी असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही बाळासाहेब यांचे विचार सोडले नाहीत. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना अशा प्रकारचा सामना करावा लागतो. सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही विचारांशी करणार नाही, असे शिंदे म्हणाले.
दिल्लीतील लोक आधी मातोश्रीमध्ये यायचे आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत आहेत. आम्ही दिल्लीला जातो ते राज्यातील विकासासाठी जातो आणि आम्ही लपून छपून काम करत नाही. मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाही. आता अनेक लोक बोलत फिरत आहेत, मला मुख्यमंत्री करा. पण आम्ही तसे कधीच केले नाही. मुख्यमंत्रिपदासाठी कधीही विचारांशी गद्दारी केली नाही, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला.