

अंबरनाथ : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 प्रकल्प विस्तार करून आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत आता मेट्रो पोहचणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मेट्रोचा थेट लाभ मिळणार असून, चिखलोली हे स्थानक एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येणार आहे.
चिखलोली रेल्वे स्थानक येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रीकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमएमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत नुकतीच बैठक पार पडली.
यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी या सूचना केल्या आहेत. याबाबत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी याबाबत मागणी देखील केली होती.कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात वाहतुकीला नवा आयाम देणारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल यांची सुसज्जता ठेवण्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वाहतूक वेगवान होण्याच्या दृष्टीने मेट्रो 5 चा विस्तार आता या भागातील विकासाचे नवे दालन उघडणारे ठरणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 हा प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे.एमएमआरडीए येथे झालेल्या बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर, आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रवी पाटील, राजेश कदम यांच्यासह एमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
या मार्गावर बिर्ला कॉलेज, शहाड, आणि उल्हासनगर यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना थेट दारात मेट्रोची सेवा उपलब्ध जाणार आहे. तर कल्याण-बदलापूर रस्त्यावरून मेट्रो धावल्याने वाहतूक कोंडीत मोठा दिलासा मिळेल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल, लोकल ट्रेनवरील ताण कमी होईल आणि पर्यावरणपूरक पर्यायामुळे प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल. शिवाय, या मेट्रो स्थानकांच्या आजूबाजूला वाणिज्य, सेवा उद्योग आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.