कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्राने तातडीने पूर्ण करावी

खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी
MP Naresh Mhaske |
खासदार नरेश म्हस्केFile Photo
Published on
Updated on

ठाणे : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (KRCL) चे भारतीय रेल्वेत (Indian Railways) विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलिनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली.

कोकण रेल्वेची स्थापना 1990 च्या दशकात एका ऐतिहासिक पावलासारखी झाली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडत पश्चिम किनारपट्टीच्या भागाला कोकण रेल्वेमुळे नवी गती दिली गेली. भारतीय रेल्वेने यामध्ये 51 टक्के भांडवली गुंतवणूक केली. तर महाराष्ट्र 22 टक्के, कर्नाटक 15 टक्के, गोवा 6 टक्के आणि केरळ राज्य शासनाने 6 टक्के आर्थिक भागीदारी केली होती. वास्तविक मूळ करारामध्ये 10 वर्षांच्या आत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे अपेक्षित होते, मात्र दुर्दैवाने आजतागायत विलिनीकरण पूर्ण झाले नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्थान मिळविण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणे आवश्यक आहे. विलिनीकरण झाल्यास रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण, तिहेरीकरण, दरड कोसळण्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी उपाययोजना, सर्व रेल्वे स्थानकांवर पुरेशा उंचीचे फलाट, फलाटावरील शेड व पूल, कोचिंग डेपो, लोकोशेड, टर्मिनस यासारख्या पायाभूत सुविधा तसेच भरीव निधी उपलब्ध होईल. विलीनीकरण झाल्याने रेल्वेच्या कमी दरात प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (KRCL) चे भारतीय रेल्वेत (Indian Railways) विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा यांनी यापूर्वीच या निर्णयाला संमती दिली आहे. महाराष्ट्राने फक्त एकच विनंती केली आहे की, या ऐतिहासिक ब्रँडचे नाव `कोकण रेल्वे' कायम राहावे आणि केंद्र सरकारनेही ते मान्य केले आहे. केंद्र सरकारला मी विनंती करतो की, या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला लवकरात लवकर गती दिली जावी आणि गेल्या तीन दशकांपासून दर्जा व संसाधने या गोष्टींची कोकण रेल्वे जी हक्कदार आहे ती तिला मिळायलाच हवी, अशी अपेक्षा शेवटी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news