

ठाणे: पश्चिम रेल्वेने वांद्रे येथील गरीब नगरमधील अतिक्रमण हटवल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या झोपड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेच्या जागेवर तब्बल 16 हजार झोपड्या बांधण्यात आल्या असून या झोपड्यांनी मध्य रेल्वेच्या जागेचे जवळपास 5 लाख चौरस मीटरचे क्षेत्रफळ व्यापले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊनही मध्य रेल्वेने आतापर्यंत या बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाई का नाही केली असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. पश्चिम रेल्वेने वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील झोपड्यांवर कारवाई करून रेल्वेची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केली. मात्र त्यानंतर आता मध्य रेल्वेच्या जागेवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या झोपड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे.
कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यान असलेल्या एका रेल्वे मार्गिकेच्या बाजूने नवीन रेल्वे मार्गिका निर्माण करून तिथे नवीन येणाऱ्या 15 डब्यांच्या लोकलसाठी जागा बनवायची आहे. मात्र याच मार्गिकेवरील रेल्वे जमिनीवर सर्वाधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विकासाला अडथळे येत आहेत.
रेल्वेच्या माहितीनुसार, कुर्ला-ट्रॉम्बे, कल्याण आणि डोंबिवली येथे सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणी रेल्वेच्या जागेवर झोपड्या, दुकाने आणि व्यावसायिक बांधकामे उभी आहेत. काही झोपड्या तर रेल्वे रुळांच्या अगदी जवळ असल्याने सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पश्चिम रेल्वेने वांद्रे येथील गरीब नगरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून हा परिसर मोकळा केला आहे. रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर इतके अतिक्रमण होत असताना संबंधित यंत्रणा काय करत होत्या, यावरूनही आता टीका होत आहे.
जेव्हा जेव्हा कारवाईसाठी पाऊले उचलली तेव्हा तेव्हा राजकीय हस्तक्षेप झाले. त्यामुळे मुंबईतील काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे ही कारवाई आम्ही थांबली असल्याचीही चर्चा आहे. मात्र पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वे सुद्धा अशा प्रकारची कारवाईची मोहीम राबवणार का असा प्रश्न आता यानिमित्ताने समोर आला आहे.
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय ?
मध्य रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या अतिक्रमण झालेल्या जागेवर कारवाईसाठी हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची देखील परवानगी आहे. 2023 मध्ये त्यांना जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. शेवटची नोटीस मे महिन्यात याच वर्षी दिली आहे. मात्र जागा खाली केल्या नाहीत.