ठाणे : इंग्रजी शाळांना उत्तेजन देणारे निर्णय घेणार्या राज्य सरकार आणि शासनाने आता शालेय अभ्यासक्रमात आहे त्या मराठी भाषेची मोडतोड करण्याचा घाट घातल्याचे चित्र आहे. यंदाच्या इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात "जंगलात ठरली मैफल" या कवितेत इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा समावेश आहे. राज्य शासन पाठ्यपुस्तकांसाठी कवितांची निवड करतांना निवड मंडळाच्या या बाबी लक्षात येत नाहीत का, असा सवाल साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षात राज्य सरकार आणि प्रशासकीय निर्णय हे इंग्रजी शाळा धार्जिणे आहे. त्यामुळे मराठी शाळांची आणि पर्यायाने विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याचे चित्र राज्यात आहेत. त्यातच सीबीएसई आणि तत्सम बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचा समावेश, बारावीपर्यंत सक्तीचे मराठी हे सगळे विषय बासनात बांधून ठेवले आहेत. त्यामुळे इतर बोर्डांच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा डाऊन मार्केट असल्याचा समज पसरवला जात आहे. त्यामुळे पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निदान महाराष्ट्र बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमात तरी मराठी भाषा आणि तिचा दर्जा राखला जावा, अशी मराठी भाषा प्रेमींची अपेक्षा आहे, मात्र शासनकर्ते आणि प्रशासन या दोहोंचे याकडे दुर्लक्ष असल्याची बाब यंदाच्या पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील कवितेतून निदर्शनास आली आहे.
या बालभारतीच्या पुस्तकात जंगलात ठरली मैफल ही पूर्वी भावे यांची कविता आहे. वाघोबा म्हणाले, नाही ना बात... बात, शोर, या हिंदी आणि माऊस, वन्समोअर इंग्रजी शब्दांची गुंफण करण्यात आली आहे.