डोंबिवली : भारताचे उद्योगरत्न पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यात एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेतर्फे डोंबिवलीत आयोजित केलेल्या नवरात्रौत्सवातील रास गरबा/दांडियाचा कार्यक्रम गुरूवारी रद्द करण्यात आल्याचे संयोजकांनी जाहीर केले. मात्र सायंकाळी पारंपारिक पद्धतीने देवीची आरती करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपातर्फे डोंबिवली पूर्वेकडील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात वातानुकूलित मंडपात सालाबादप्रमाणे यंदाही नमो रमो नवरात्रौत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे. या उत्सवानिमित्त दररोज संध्याकाळी सात वाजता देवीची आरती आणि त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत दांडिया, रास, गरबा हे मनोरंजनाचे कार्यक्रम खेळले जातात. डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तरूणाई, अबाल-वृद्ध महिला, पुरूष या कार्यक्रमात सहभागी होतात.
अशाच पध्दतीने डोंबिवली पूर्वेतील डी. एन. सी. रोडला असलेल्या ध. ना. चौधरी विद्यालयाच्या पटांगणावर शिवसेना नेते तथा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नवरात्रौत्सव कार्यक्रम आयोजित केला जातो. येथेही दररोज संध्याकाळी आरती आणि रात्री दहा वाजेपर्यंत रास गरबा, दांडियाचे उत्सवी कार्यक्रम केले जातात. या ठिकाणी देखिल शेकडो उत्सवी मंडळी दांडिया रास, गरबा खेळण्यासाठी येतात.
बुधवारी रात्री उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्याने राज्य शासनाने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच, रतन टाटा यांना आदरांजली वाहण्याचा भाग म्हणून गुरुवारी डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेनेतर्फे नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत होणारे रास, गरबा, दांडिया कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. संध्याकाळी सात वाजताची फक्त आरतीचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. तथापी त्यानंतर होणारे मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.