

ठाणे : 267 नगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना अशा रंगलेल्या जोरदार निवडणुका, शिंदे सेनेच्या नेत्यांवर दाखल झालेले गुन्हे आणि शिवसेनेच्या मंत्री भरत गोगावले, आमदार नीलेश राणे, संतोष बांगर, शहाजी बापू पाटील यांनी मनातील व्यक्त केलेली खदखद कणकवलीत ठाकरे सेना शिंदे सेना एकत्र लढल्याने तयार झालेले नवे समीकरण या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी दिलेली हाक आठवू लागली आहे आणि चिमण्यांना मातोश्री खुणावू लागली आहे.
मंगळवारी नगरपालिका निवडणुकांच्यावेळी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यात रंगलेले वाक्युद्ध विकास गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे दाखवलेले पिस्तूल आणि त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा या सार्यामुळे भरत गोगावले अस्वस्थ झाले आणि ‘मातोश्री’चे संबंध आमचे आजही कायम असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्याबरोबर संबंध असणे यात गैर काय, असा प्रतिसवालही पत्रकारांना केल्याने ‘मातोश्री’च्या आठवणीचे संकेत त्यांनी दिले आहेत.
नीलेश राणेंची खदखद
याबाबतची पहिली खदखद व्यक्त केली ती शिंदे शिवसेनेचे मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी. कोकणात खासदार नारायण राणेंना डावलून भाजपचे प्रदेशाध्यक्ष काम करत असल्याचा त्यांचा थेट आरोप आहे. दुसर्या बाजूला महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते पिस्तूल घेउन आपल्यावर हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यात गुन्हा विकास गोगावलेंवरच दाखल झाला, असा शिवसेना शिंदे गटाचा आरोप आहे.
सांगोल्यातील झाडाझडती
तिसर्या बाजूला सांगोल्याचे शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाची झाडाझडती झाली. त्याआधी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला गेला. या चारही प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गट टार्गेट झाल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत खदखद आणि ‘मातोश्री’ची आठवण या सर्वांना येत असल्याचे हे नेते सांगू लागले आहेत.
शिंदेंच्या कोपरी मतदारसंघातील कार्यकर्ते ठाकरेंकडे परतले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील शंभरपेक्षा जास्त कार्यकर्ते माघारी परतल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान गहाण टाकून भाजपची फटके खाणारी संघटना बरी की, स्वाभिमानाने जगणारी बरी, ते तुम्ही ठरवा, अशी साद शिवसैनिकांना घातली आहे. कणकवलीत ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र आली तेव्हा दोन्ही बाजूकडून मूक संमती मिळाली. त्यामुळे हा पॅटर्न राज्यात अन्यत्रही पुढे येऊ लागला आहे.