

भिवंडी : खड्डे व निष्कृष्ट कामामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या भिवंडी-वाडा महामार्गावर स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी घडली आहे.
या महामार्गावर शुक्रवारी सकाळी रेहमान अली शेख (वय-२२, रा. मुंब्रा) हा साई होमिओपॅथिक महाविद्यालयात बीएचएमएस च्या शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी दुचाकीवरून दुगाड येथील महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित जाण्यासाठी आपल्या घरून निघाला होता. शेलार गावाच्या हद्दीत काँक्रिट व डांबरी रस्त्यामधील भेगेतील रस्त्यामध्ये त्याची दुचाकी घसरली.
दरम्यान तो रस्त्यावर पडला असता त्याचवेळी भरधाव कंटेनरच्या चाकाखाली चिरडला गेला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत रेहमानला स्थानिकांनी तत्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातात कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. यापूर्वी काही दिवसांपूर्वी या महामार्गावर खड्ड्यांमुळे एका तरुणाचा बळी गेला होता.
महामार्ग बनतोय 'मृत्यूचा सापळा'
मागील तीस दिवसांमधील हा दुसरा मृत्यू असून भिवंडी वाडा महामार्ग 'मृत्यूचा सापळा' बनल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.